Indian Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान होणारे गैरप्रकार आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नव्या नियमांनुसार, आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना 250 ऐवजी थेट 500 रुपये किमान दंड भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून हे सुधारित नियम लागू होण्याची शक्यता असून महिलांच्या डब्यात बसणाऱ्या पुरुषांना, अनधिकृत फेरीवाले आणि भिकाऱ्यांविरोधातही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जाणून घेऊया याबाबतचे सविस्तर वृत्त...
विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांना भरावा लागणार दुप्पट दंड
केंद्र सरकारने विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड 250 रुपयांवरून दुप्पट करून 500 रुपये करण्याचा आणि रेल्वेतील अनेक गुन्ह्यांसाठी उच्च दंड लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याची माहिती रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेला कळवली आहे. तसेच सुधारित तरतुदी 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(नक्की वाचा : IndiGo Cabs: फक्त 49 रुपयात कॅब... विमानतळावरुन येण्या- जाण्याचं टेन्शन मिटलं, कसे कराल बुकिंग?)
कोणकोणाविरोधात होणार कारवाई?
- तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या किंवा आधीच वापरलेले तिकीट पुन्हा वापरणाऱ्या प्रवाशांना आता 250 रुपयांऐवजी 500 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. दंड न भरल्यास हे प्रकरण सक्षम न्यायालयाकडे पाठवले जाऊ शकते.
- दुसऱ्या व्यक्तीच्या तिकिटावर प्रवास करण्याच्या दंडांमध्येही बदल करण्यात आला आहे. अशी तिकिटे जप्त केली जातील आणि प्रवाशाला भाडे तसेच अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, ज्यामध्ये किमान दंड 500 रुपये असेल.
- ट्रेन आणि रेल्वे आवारात विनापरवाना फेरीवाला व्यवसाय (हॉकिंग) आणि भीक मागणाऱ्यांना 2 हजार रुपये दंड आकारला जाईल. रेल्वेचे डबे आणि स्थानकांवर भीक मागण्यास स्पष्टपणे मनाई करतात.
- वारंवार गुन्हा करणाऱ्यांना एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- प्रवाशांना त्रास देणारे, शिवीगाळ किंवा अश्लील भाषा वापरणारे, रेल्वेच्या सुविधांमध्ये हस्तक्षेप करणारे किंवा सहकारी प्रवाशांना गैरसोय निर्माण करणाऱ्या प्रवाशांना 1 हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागू शकते.
- जे लोक नशेत आढळतील, गोंधळ घालतील त्यांना ट्रेन आणि स्थानकांमधून बाहेर काढले जाऊ शकते तसेच दंडात्मक कारवाई होऊ शकते.
- प्रस्तावित सुधारणांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या कोच, जागा किंवा बर्थवर बसलेल्या पुरुषांसाठी 2 हजार 500 रुपये दंडाची तरतूद आहे. ट्रेनमध्ये प्रतिबंधित किंवा धोकादायक वस्तू नेल्यास किमान 10 हजार रुपये दंड होऊ शकतो.
- प्रवासी भागात विनापरवाना प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल तर अनधिकृत फेरीवाले, भिकारी आणि इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आता अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे बाहेर काढले जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world