- कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मद्यधुंद तरुण झोपलेला आढळला
- मनसे आणि शिवसेना नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार समोर आला
- मद्यधुंद तरुण डोक्याखाली चप्पल ठेवून आरामात झोपलेला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
अमजद खान
केडीएमसी मुख्यालयात मोठ्या नेत्यांची उपस्थिती, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका मुख्यालय परिसरात एक मद्यधुंद तरुण आरामात झोपलेला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने मनसे नेते राजू पाटील , खासदार श्रीकांत शिंदे , कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्यासह मनसे आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत विकासकामांबाबत बैठकही घेतली. मोठ्या नेत्यांचा दौरा असल्याने महापालिका परिसरात सर्वत्र सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान महापालिका मुख्यालयातील पदाधिकारी इमारतीच्या बाजूला असलेल्या जागेत एक मद्यधुंद तरुण झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे त्या तरुणाने डोक्याखाली चप्पल ठेवून तो निवांत झोपला होता. काही नागरिकांची नजर त्याच्यावर पडताच त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका सुरक्षा रक्षकांनी धाव घेत त्या व्यक्तीला उठवले.
मात्र एवढ्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेदरम्यान हा प्रकार घडल्याने महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मनसे नगरसेविका शितल मंढारी आणि शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जेव्हा आमची महासभा असते तेव्हा सामान्य नागरिकांची कडक तपासणी केली जाते. मग आज सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता केडीएमसी आयुक्त या प्रकरणात कारवाई करणार की दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.