- कल्याणमधील भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे एका बँकेत कार्यरत तरुणाने रेबीजच्या भीतीने आत्महत्या केली
- आयाश विश्वनाथ आमीन याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यावर रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतले होते
- मनोज कुलकर्णी यांनी प्रशासनावर खाजगी कंत्राटदार कंपनीचे निर्बीजीकरण प्रकल्प नीट न चालवण्याची तक्रार केली आहे
अमजद खान
भटक्या कुत्र्यांची दहशत अनेक शहरात आहेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहीजे अशी वारंवार मागणी होते. पण त्यावर ठोस कोणताही उपाय केला जात नाही. कुत्रे कधी ही कुणावरही हल्ला करतात. त्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जणांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. पण त्या पेक्षा ही वेगळी आणि धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणमधील भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने बँकेत चांगल्या पदावर काम करणाऱ्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील सहजीवन सोसायटी आहे. या सोसायटीत आयाश विश्वनाथ आमीन हा तरुण राहत होता. तो एका बँकेत मोठ्या पदावर कामाला होता. काही दिवसापूर्वी आयाश याच्या पायाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर त्याने रेबीजचे इंजेक्शन घेतले होते. मात्र काही दिवसाापासून तो चिंतेत होता. त्याला वाटत होते की मला रेबीज होईल. त्याची लक्षणे दिसू लागली आहे असे त्याला वाटत होते. त्यातूनच तो खचत चालला होता. मला रेबीज झाला तर माझ्या घरच्यांचे काय होईल ही चिंता त्याला खात होती.
या भितीपोटी त्याने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत त्याने आत्महत्ये मागील कारणं लिहिली आहेत. कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्याची दहशत आहे. आतापर्यंत अनेकांचा त्यांनी चावा घेतला आहे. तरी प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा प्रकल्पही खाजगी कंत्राटदार कंपनीकडून चालविला जातो. या खाजगी कंत्राटदार कंपनीकडून योग्य प्रकारे काम केले जात नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी प्रशासनाचे वारंवार केली आहे.
आता तर भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका तरुणाने भिती पोटी आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतरही महापालिका प्रशासनाला जाग येणार आहे की नाही ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली आहे. भटक्या कुत्र्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी ही मागणी त्यांनी केली आहे. मात्र या तरूणाच्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे. त्याने पुन्हा एकदा खरोखर रेबीज झाला आहे की नाही याची खातरजमा करायला हवी होती. पण त्याने तसे न करता केवळ भीती पोटी स्वत:चा जीव दिला.