Mumbai News : राज्यभरात तीव्र उकाड्यामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे मान्सून कधी बरसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र अद्याप मान्सून केरळमध्येही दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या १ जूनपासून हवामानात बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे.
मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.
शेतकऱ्यांनी पेरणीची सुरुवात कधी कराल?
मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते ती पेरणीसाठी. काही जिल्ह्यात पाऊस बरसला असला आणि जमिनीत काही प्रमाणात ओलावा आला असला तरीही पेरणी करण्यास सुरू करू नये अशी सूचना कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अन्यथा दुबार पेरणीची भीती राहील. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.