Maharashtra Rain Forecast: राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने (IMD) पावसाबाबत अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या सक्रिय स्थितीमुळे राज्यात पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा
आज रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे तब्बल 170 मिलिमीटर असा राज्यातील सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- Pune News: लग्नासाठी वडिलांनी आधार कार्डमध्ये केला घोटाळा; मुलीच्या एका कॉलने खळबळ)
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात 'येलो अलर्ट'
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासाठी या भागात 'येलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान प्रणाली अन् तापमानातील चढ-उतार
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.