- इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील तेल-गॅस पुरवठा साखळी बाधित
- मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक हॉटेलांना आपले कामकाज बंद करावे लागेल?
- भारताला एलपीजी आयातीसाठी गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे
India Gas Crisis: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्यपूर्व भागातील तणाव वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायल सातत्याने तेल तसेच गॅस रिफायनरींना लक्ष्य करत असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. गंभीर परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपल्या रिफायनरी बंद केल्या आहेत. गॅसचे उत्पादनच थांबल्याने इतर देशांपर्यंत पुरवठा करणे कठीण झाले आहे, ज्याचा थेट परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. बंगळुरूनंतर आता मुंबईत व्यावसायिक (Commercial) गॅसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की मुंबईत एलपीजी सिलिंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. हॉटेलमध्ये जेवण बनवायचे कसे? असा प्रश्न हॉटेल मालकांसमोर आहे.
मुंबईमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा
गॅस संकटामुळे 'आहार'च्या (AHAR) एका शिष्टमंडळाने मंगळवारी (10 मार्च) महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. अनेक वर्षांनंतर मुंबईसमोर असे ऊर्जा संकट उभे राहिले आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या अभावामुळे आधीच सुमारे 20 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना आपले कामकाज बंद करावे लागले आहे.
मुंबईत 50 टक्के रेस्टॉरंट्स बंद होऊ शकतात?
असोसिएशनने इशारा दिला आहे की, येत्या 72 तासांत पुरवठा न मिळाल्यास शहरातील निम्मी रेस्टॉरंट्स बंद होतील. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) या मार्गावरून होणारी टँकर्सची वाहतूक ठप्प झाली आहे. भारत आपल्या एलपीजी आयातीचा मोठा हिस्सा याच मार्गावरून घेतो, त्यामुळे पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची घेतली भेटगॅस वितरकांच्या मते, घरगुती सिलिंडरचा पुरवठा सध्या सुरू आहे, पण त्यासाठी 25 दिवसांचा 'लॉक-इन' कालावधी लागू करण्यात आला आहे. पण 19 किलो आणि 47 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा रविवारपासून (8 मार्च) पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संकटाबाबत 'आहार'चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याशीही संपर्क साधला आहे. तसेच हॉटेल उद्योगासाठी प्राधान्याने कोटा मिळावा या मागणीसाठी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
दादर, अंधेरी आणि माटुंगा यासारख्या भागांतील प्रसिद्ध रेस्टॉरंट्सनी गॅसचा साठा वाचवण्यासाठी आपला मेन्यू मर्यादित केला आहे. गॅसची बचत करण्यासाठी 'दाल मखनी' किंवा 'रवा डोसा' यासारखे मंद आचेवर शिजवले जाणारे पदार्थ मेन्यूमधून तात्पुरते हटवण्यात आले आहेत. खवय्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मध्यपूर्वेत रिफायनरी बंद, साठेबाजी रोखण्याचे प्रयत्न
केंद्र सरकारने घरगुती एलपीजी टंचाई टाळण्यासाठी रिफायनरींना देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे व्यावसायिक क्षेत्रावरचा दबाव अधिक वाढला आहे. दुसरीकडे ऑइल मार्केटिंग कंपन्यांचा (OMCs) दावा आहे की त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे, पण साठेबाजी रोखण्यासाठी ते व्यावसायिक वितरणावर मर्यादा घालत आहेत.