Mumbai Rain: मुंबईला पावसाचा रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी, खासगी कंपन्यांचं काय?

Mumbai Rain: भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व खाजगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) पावसाचा जोर प्रचंड वाढला असून परिस्थिती गंभीर बनली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा म्हणजेच 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पावसामुळे आणि ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांच्या शक्यतेमुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. 

खाजगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि लोकल रेल्वेवरील ताण लक्षात घेता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालयांना कडक सूचना दिल्या आहेत. सर्व खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना आज घरातूनच काम करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)

शासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी

खाजगी क्षेत्रासोबतच सरकारी कार्यालयांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना आज दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सुट्टीचा निर्णय केवळ बिगर-अत्यावश्यक सेवांना लागू असेल. मुंबई महानगरपालिका, पोलीस, अग्निशामक दल, रुग्णालये आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असणार नाही. 

(नक्की वाचा-  Prathmesh Parab: 'दगडू'ची गाडी रुतली चिखलात! वसईची पोरं आली धावून, मात्र प्रथमेश VIDEO मुळे होतोय ट्रोल?)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसासोबतच मुंबईत ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे झाडे पडणे, होर्डिंग्स कोसळणे किंवा वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडू शकतात. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना खिडक्या व दरवाजे बंद ठेवण्याचे, जुन्या इमारतींच्या आडोशाला उभे न राहण्याचे आणि समुद्रकिनाऱ्यांवर जाणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. 
 

Topics mentioned in this article