Mumbai News : आधीच कमी पाऊस आणि महापालिकेने लागू केलेली पाणी कपात यामुळे मुंबईकर हैराण झाले असतानाच आता शहरावर जलसंकटाचं आणखी एक गडद सावट आलं आहे. खाजगी पाणी टँकर्सच्या पुरवठ्यातही मोठी घट झाली असून यामुळे मुंबईतील पाणी टंचाई अधिकच गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेच्या व्यतिरिक्त अनेक सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापने खाजगी टँकर्सवर अवलंबून असतात. मात्र, सध्या टँकर्सची संख्या निम्म्यावर आली आहे. या समस्येचे मूळ कारण वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबीर सिंग बिरा यांनी उघड केले आहे. त्यांच्या मते, मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील रस्ते काँक्रिटीकरणामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. महापालिकेच्या पाणी कपातीमुळे आधीच सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्यात आता टँकर्सच्या कमतरतेची भर पडल्याने सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांना पाण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत, तर काही ठिकाणी टँकर्स मिळणेच कठीण झाले आहे. शहरातील विहिरी आणि जलस्त्रोत हे टँकर पुरवठ्याचे मुख्य आधार होते. मात्र, काँक्रिटीकरणामुळे या स्त्रोतांचे पुनर्भरण होणे बंद झाले आहे. जर हीच स्थिती कायम राहिली, तर भविष्यात केवळ पिण्याच्याच नव्हे, तर वापराच्या पाण्यावरूनही शहरात मोठे वाद निर्माण होऊ शकतात. पर्यावरणतज्ज्ञांनी यापूर्वीच काँक्रिटीकरणाच्या दुष्परिणामांबाबत इशारा दिला होता, जो आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
टँकर्स आणि पर्यायी जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत ठोस धोरणाची आवश्यकता
केवळ टँकर पुरवठा वाढवून यावर कायमस्वरूपी उपाय निघणार नाही. काँक्रिटीकरण करताना 'वॉटर परमेबल' (पाणी जिरू देणारे) तंत्रज्ञान वापरणे किंवा पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची सक्ती करणे, यांसारख्या गोष्टींची आता गरज आहे. महापालिकेला केवळ पाणी कपात करून चालणार नाही, तर खाजगी टँकर्सच्या उपलब्धतेबाबत आणि पर्यायी जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत ठोस धोरण आखण्याची वेळ आली आहे. सध्या तरी मुंबईकरांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असून, येणारे काही दिवस पाणी जपून वापरण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचा वेग प्रचंड आहे. सिमेंटच्या जाड थरामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट गटारात किंवा नाल्यावाटे समुद्रात वाहून जाते. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी दरवर्षी खाली जात आहे. ज्या विहिरी वर्षानुवर्षे पाण्याचे स्त्रोत होत्या, त्या आता कोरड्या पडू लागल्या आहेत.