Mumbai Lakes Water Level: मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन न झाल्याने मुंबईकर चिंतेत आहेत, यातच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. पाऊस कधी पडणार? हा प्रश्न मुंबईकरांना सतावतोय. मुंबईकर उकाड्याने हैराण झाले असून आता पाण्याचीही चिंता सतावू लागली आहे. 15 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा 10.72 टक्के इतकाच क्षिल्लक आहे. अप्पर वैतरणा (Upper Vaitarna Lake), मध्य वैतरणा (Middle Vaitarna Lake), भातसा (Bhatsa Lake), तानसा (Tansa Lake), तुळशी (Tulsi Lake), मोडक सागर (Modak Sagar Lake) आणि विहार (Vihar Lake) अशी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची नावे आहेत. या तलावांची एकूण पाणी साठवणूक क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर इतकी आहे.
मुंबईतील तलावांमधील पाण्याची पातळी| Water Level In Mumbai Lakes
1. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, सोमवारी (15 जून) सकाळी 6 वाजता विहार आणि तुळशी तलाव अनुक्रमे 42.69 टक्के आणि 23.6 टक्के भरले होते. या तलावांची क्षमता अनुक्रमे 27,698 आणि 8,046 दशलक्ष लिटर आहे.
2. मोडक सागर तलावाची एकूण क्षमता 1,28,925 दशलक्ष लिटर असून सध्या त्यात 39,823 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे, जो त्याच्या एकूण क्षमतेच्या 30.89 टक्के आहे.
3. तानसा तलाव हा सर्वात जास्त कोरडा पडलेल्या तलावांपैकी एक आहे. या तलावाची एकूण क्षमता 1,45,080 दशलक्ष लिटर असून सध्या त्यात केवळ 8,029 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. येथील पाणीसाठा सध्या 5.53 टक्क्यांवर आहे.
4. मध्य वैतरणा तलावाची स्थिती तुलनेने चांगली असून त्यात 21,674 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पण तरीही हे प्रमाण त्याच्या 1,93,530 दशलक्ष लिटरच्या एकूण क्षमतेच्या केवळ 11.20 टक्के इतकेच आहे.
5. मुंबईचा सर्वात मोठा जलाशय असलेल्या भातसा तलावामध्ये सध्या 71,917 दशलक्ष लिटर पाणी आहे. या तलावाची क्षमता 7,17,037 दशलक्ष लिटर एवढी असूनही सध्या हा जलाशय केवळ 10.03 टक्के भरला आहे.
6. अप्पर वैतरणा तलाव अजूनही पूर्णपणे कोरडा (शून्य टक्के) आहे.
मुंबई हवामान अंदाज आणि भरती-ओहोटीची वेळ
सोमवारी (15 जून) मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिवसभर उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे, तर रात्री उशीरा किंवा मंगळवारी (16 जून) पहाटे हलका पाऊस पडू शकतो.
(नक्की वाचा : Big News: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील बळीराजा सुखावणार, सरकारकडून 836 शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांची मदत)
हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहण्यासोबतच वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण या काळात मोठ्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.