मागील चार दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज पहाटेपासून मुंबईत अनेक भागात पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यामुळे मुंबईकर पुन्हा एकदा अलर्ट मोडमध्ये आले आहेत.
सध्या सुरू असलेला पाऊस मध्यम स्वरुपाच असला तरी, पाऊस असाच सुरु राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोकल सेवा आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
मुंबईतील शाळा सुरु
मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करणारे एक परिपत्रक काल व्हायरल झाले होते. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण देत, कोणतेही परिपत्रक मुंबई महापालिकेनं (BMC) काढलेलं नाही. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट खोटी असल्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं होते.
(नक्की वाचा- Monorail News: 'त्या' एका चुकीमुळे मोनोरेल बंद पडली, MMRDA ने कारण सांगत दिलं स्पष्टीकरण)
पावसाची स्थिती काय?
19 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपासून ते 20 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत, मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई शहरात 131.51 मिमी, पूर्व उपनगर 159.66 मिमी, पश्चिम उपनगरात 150.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून लक्षात येते की मुंबईच्या तिन्ही विभागांमध्ये 'खूप जोरदार पाऊस' झाला आहे. विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. मात्र, आज सकाळी 5 ते 6 या वेळेत शहराच्या सर्व भागांत हलक्या पावसाची नोंद झाली, ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली.
(नक्की वाचा- Pune Rain: अतिवृष्टीमुळे पुणे प्रशासन अलर्ट मोडवर, 24 तास अधिकारी-कर्मचारी तैनात)
रेल्वे रस्ते वाहतूक कशी?
सध्यातरी लोकलची वाहतूक वेळेवर सुरु आहे. तर रस्ते वाहतूकही सुरळीत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वे सेवा आणि बेस्ट बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. बेस्ट बस वाहतूकही सुरळीत असून कोणताही मार्ग वळवण्यात आलेला नाही. यामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास आवश्यक ती खबरदारी घेण्याची तयारी केली आहे.