रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbra AIMIM Corporator Sahar Sheikh Issues Written Apology : मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी अखेर माफी मागितली आहे. मुंब्रा शहराला पूर्णपणे हिरवेगार करण्याबाबतचे त्यांचे वक्तव्य चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून अखेर सहर शेख यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत लेखी स्वरूपात माफी मागितली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये पाचारण केले होते.
काय आहे प्रकरण?
मुंब्रा शहरात एका जाहीर सभेत बोलताना सहर शेख यांनी आगामी पाच वर्षात मुंब्रा येथील प्रत्येक उमेदवार हा एमआयएम पक्षाचा असेल आणि मुंब्रा पूर्णपणे हिरव्या रंगात रंगवून टाकू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सहर शेख यांचे हे वक्तव्य हिंदू समुदायाला घाबरवणारे आणि चिथावणी देणारे असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत कडक कारवाईची मागणी केली होती.
(नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत सहर शेख यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी सहर शेख यांना दोनवेळा चौकशीसाठी बोलावले होते.
त्यानंतर सहर शेख यांनी पोलिसांकडे आपले स्पष्टीकरण देताना लेखी माफीनामा सादर केला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, जर माझ्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते, असे त्यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
सोमय्या काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, सहर शेख यांनी आता लेखी माफी मागितली आहे. मुंबईला हिरवे करण्याचे स्वप्न पाहणे हे हिंदूंना भडकवण्यासारखेच आहे. सहर ही 22 वर्षांची एक तरुण मुलगी असल्यामुळे आम्ही तिचा माफीनामा स्वीकारला आहे. मात्र एमआयएमसारखे पक्ष आता आपल्या पुढच्या पिढीला कट्टरपंथी बनवण्याचे काम करत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
एमआयएम म्हणजे नवीन मुस्लीम लीग असून ते मुस्लीम बांधवांना भडकवण्याचे काम करत आहेत. मालेगाव आणि मानखुर्दमध्ये त्यांनी जे केले, तोच प्रयत्न आता मुंबईत करण्याचा त्यांचा डाव आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सहन करणार नाही.
मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी माहिती दिली की, किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या भाषणाबाबत दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना 168 कलमानुसार नोटीस बजावण्यात आली होती.
सहर शेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपला जबाब नोंदवला आहे. आपल्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्याने जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून मुंब्राला हिरवे बनवू, असा आपला अर्थ होता असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देशाच्या तिरंग्यासाठी आपण प्राण द्यायलाही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा असे वक्तव्य न करण्याबाबत लेखी ताकीद दिली आहे.