मुंब्रा इथे घडलेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मुंबईतील लोकल रेल्वेचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद करण्यासाठीची यंत्रणा राबवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावरून सर्वसामान्य प्रवाशांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. NDTV मराठीने सोशल मीडियाद्वारे जनतेला एक प्रश्न विचारला होता. लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे का ? असा प्रश्न विचारत जनतेला आपले मत मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
लोकं गुदमरून मरतील
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद होणारी यंत्रणा लागू झाली तर काय होईल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले की, "लोकं आतमध्ये गुदमरून मरतील. किती गर्दी असते कल्पना आहे का तुम्हाला ? परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे ट्रॅफीक आणि रेल्वेसेवेचा बोजवारा उडालेला आहे. लोकं लोकल ट्रेनच्या आत कशी शिरतात आणि कशी बाहेर येतात हे कळत नाही." तर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, " सगळ्या लोकलसाठी दरवाजे बंद करण्याची यंत्रणा लावणे अशक्य आहे. असं झाल्यास लोकं गुदमरतील. लोकांना श्वास घ्यायला हवा तर आली पाहीजे ना."
नक्की वाचा : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
नागरीक म्हणतात लोंढे थांबवा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. परप्रांतीयांचे लोंढे थांबवा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
आशिर्वाद दाभणे नावाच्या नागरिकाने याबद्दल बोलताना म्हटले आहे की, 'एकदा आपले खासदार आणि आमदार साहेबांना ट्रेनचा प्रवास करू द्या, मग त्यांना कळेल', तर प्रदीप रामचंद्र यांनी म्हटलंय की, 'दरवाजे बंद करण्यासाठी पहिल्यांदा लोकल वाढवायला लागतील. दर तीन मिनिटाला तरी एक लोकल असली तरच हे शक्य आहे. इथे पंधरा ते वीस मिनिटं ट्रेन येत नाही. तुम्ही दरवाजे कसे काय लावणार? बोलणं सोपं आहे.' प्रबुद्ध गायकवाड यांनी म्हटलंय की, 'प्रत्येकाला दोन वेळेच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागतोय, ठरलेल्या वेळेत कामावर पोहचणं गरजेचं असतं म्हणून एवढी धावपळ आणि पळापळ. जीव मुठीत घेऊन चालू असते. लोकलची दार बंद करून तुमचं अपयश दाराआड करू नका. करायची असेल तर लोकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल अशी कायमची उपाययोजना करा. ज्या गोष्टीची गरज नागरिकांना खऱ्या अर्थाने आहे. त्या गोष्टी करण्याच धाडस इथल्या शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं पाहीजे. दारं बंद करून काय होत नसतं ...!