Nagpur News : विदर्भात एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने जिल्हा प्रशासनाने शाळांची वेळ सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मर्यादित केली आहे. मात्र, तरीही लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न अद्याप संपलेले नाही.
शाळाच्या वेळा बदलूनही त्रास कमी होईना...
नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा लवकर भरवून १०:३० वाजता सुट्टी देण्याचे आदेश दिले असले, तरी मुलांच्या त्रासात घट झालेली नाही. विद्यार्थ्यांची शाळा १०:३० वाजता सुटली तरी बस, रिक्षा किंवा इतर वाहनांनी घरी पोहोचेपर्यंत दुपारचे १२ वाजतात. दुपारी १२ वाजता ऊन सर्वोच्च पातळीवर असतं, ज्यामुळं मुलं थेट उन्हाच्या संपर्कात येतात. ग्रामीण भागात तर मुले बसची वाट पाहत तासन् तास झाडाखाली उभी राहतात. सावली असली तरी गरम हवेच्या लाटा मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करत आहेत. शाळेतून घरी जाताना उन्हाचा त्रास झालेली लहान मुले डॉक्टरांकडे येत आहेत. डोकं दुखतंय, चक्कर किंवा सुस्त वाटतंय अशा तक्रारी घेऊन मुलं डॉक्टरांकडे येत आहेत.
याबाबत बालरोजतज्ज्ञ डॉ. शिल्पा हजारे यांनी सांगितलं, सावली जरी असली तरी, गरम हवेच्या लाटांनी उष्माघाताचा मोठा धोका असतो. यंदा शाळा ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. मग दहा दिवसांसाठी दोन अडीच तासांसाठी मुलांना का बोलवताय? ऑन लाईन शाळा घ्या किंवा दुसरा पर्याय शोधा, असं कळकळीचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी?
मुलांच्या सोबत पाण्याच्या बाटलीत ओआरएस किंवा लिंबू पाणी द्या.
शाळेतून आल्यावर मुलांना लगेच थंड पाणी न देता, शरीराचे तापमान सामान्य होऊ द्या.
शक्य असल्यास डोक्यावर सुती टोपी किंवा रुमाल बांधावा.