राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Latest News : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना' जाहीर करून नागरिकांना कर भरण्याची संधी दिली असली, तरी काही मालमत्ताधारकांकडून अजूनही कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेने थकीत कर वसुलीसाठी अटकावणीची मोहीम तीव्र केली आहे.महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ता धारकांवर अटकावणीची जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण 130 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे.
सहा वर्षांपासून मालमत्ता कर भरला नाही
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सेक्टर 18, तुर्भे येथील कोल्ड स्टोरेजवरही महानगरपालिकेने कारवाई केली आहे. हे कोल्ड स्टोरेज हे प्रभू हिरा कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून मालमत्ता कर भरलेला नसल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले.या कोल्ड स्टोरेजवर सध्या 4 कोटी 75 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> Baramati News: अजित पवारांच्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? 'या' समाजातील नेते निवडणूक लढवण्यावर ठाम
त्यामुळे महानगरपालिकेने संबंधित मालमत्तेवर अटकावणीची कारवाई करत थकीत कर वसुलीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.महानगरपालिकेने सर्व थकीत मालमत्ता धारकांना ‘अभय योजना'चा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरावा,अन्यथा अशाच प्रकारची अटकावणीची कारवाई करण्यात येईल,असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.