Navi Mumbai Video: नवी मुंबई आणि मुंबईतील काही भागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या वारंवार तसेच दीर्घकालीन वीज खंडिततेमुळे ( Navi Mumbai Power Cut Issues) स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेक निवासी भागांत रात्री उशीरापर्यंत वीज गायब असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर काही भागांत तर थेट रात्रीपासून ते अगदी पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत आणि प्रचंड उकाड्यात रात्रीच्या वेळी वीज जात असल्याने नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांच्या दैनंदिन कामकाजावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नागरिकांचा संताप वाढला
याच गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा एका महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील उलवे सेक्टर आठमध्ये राहणाऱ्या या महिलेने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे सलग अनेक रात्री झोप पूर्ण होत नसल्याची व्यथा मांडली आहे. ही भीषण परिस्थिती सांगताना तिला इतका त्रास होतोय की तिला अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओमुळे आता प्रशासनाविरोधात नागरिकांमधील संताप अधिकच तीव्र झाला आहे.
(नक्की वाचा : Weather Alert: बापरे! 15 जूनपर्यंत चिंता कायम, उष्णतेची लाट की पावसाचा दिलासा? शेतकरी,सामान्यांसाठी मोठा इशारा)
झोप पूर्ण होत नसल्याने तरुणी ढसाढसा रडतेय पाहा VIDEO
विश्रांतीचे महत्त्वाचे तास अंधारात; आरोग्यावर परिणाम
महिलेने व्हिडीओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ही महिला रात्री 11 वाजता कामावरून घरी परतते आणि पुन्हा सकाळी 6 वाजता तिला कामासाठी घराबाहेर पडावे लागते. दिवसभराच्या थकव्यानंतर तिला हवा तसा आराम करता येत नाही. कारण पहाटे 4-5 वाजेपर्यंतचा वेळ तिला विजेविना प्रचंड उकाड्यात आणि अंधारात घालवावा लागत आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या सततच्या त्रासामुळे झोप पूर्ण होत नाहीय, तब्येतीवरही वाईट परिणाम होत असल्याचं तिचं म्हणणंय.