
NDTV Marathi Manch : जम्मू काश्मीरमध्ये आमची हॉटेल्स आहेत. आमचं हॉटेल हिंदू हॉटेल म्हणून टार्गेट करण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी केला आहे. महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि एनडीटीव्ही मराठीला झालेल्या वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'NDTV मराठी मंच' या कार्यक्रमात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी मी 15 दिवसांपूर्वी होतो. मोदी सरकारनं कोरोनानंतर काश्मीर सुरळीत केलं होतं. या घटनेमुळे काश्मीर खूप मागे गेलं. आमची काश्मीरमध्ये हॉटेल्स आहेत. आमचं हॉटेल हिंदू हॉटेल म्हणून तिथं टार्गेट करण्यात आलं होतं. हे बाहेरचे लोकं आहेत त्यांना व्यवसाय द्यायचा नाही, या पद्धतीनं आम्हाला टार्गेट करण्यात आलं.
पण, आज आम्हाला लोकं म्हणतात आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये येऊन राहतो. आमच्या हॉटेलमध्ये रोज राष्ट्रगीत होतं. काश्मीरमध्ये राष्ट्रगीत होणारं हे एकमेव हॉटेल आहे. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो लावण्यात आला आहे, तिथं आता पर्यटक यायला लागली आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर मागं गेलंय पण, सरकार कठोर कारवाई करेल आणि काश्मीर पुन्हा पूर्वपदावर येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. आता सोशल मीडिया खूप प्रगत झाला आहे. तो तुम्हाला सर्व घडामोडी लाईव्ह दाखवतो. मुंबईवरही हल्ला झाला होता, त्यानंतरही मुंबई सुरु राहिली. तसंच इथं होईल, हे सरकार गप्प बसणारं नाही, असं पाटील म्हणाले.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
धार्मिक पर्यटनाला भविष्य
आपल्या देशात धार्मिक पर्यटनाला मोठं भविष्य आहे, असं कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक विशाल विठ्ठल कामत यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं.
आपण धार्मिक कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन करु शकतो हे कुंभमेळ्यानं देशाला दाखवलं आहे. कुंभमेळ्यातत करोडो लोकं आली पण तरीही स्वच्छता आणि सुरक्षितता उत्तम होती. तेथील अनुभवाचा फायदा नाशिकमधील कुंभमेळ्यात आपल्याला होईल, असं कामत म्हणाले.
राजकीय इच्छाशक्ती आवश्यक
महाराष्ट्रात पर्यटनाच्या खूप गोष्टी आहेत पण, महाराष्ट्र ब्रँडिग आणि सुविधांमध्ये कमी पडतो. पर्यटक मुंबईत येतात पण, तिथून जयपूर, आग्रा, इंदूर, केरळ, गोव्याला जातात. आपल्याकडं पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज आहे. गोव्याचा विकास झाला तसा कोकणाचा विकास झाला नाही. या गोष्टी बदलण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असं शैलश पाटील यावेळी म्हणाले.
धार्मिक पर्यटन देशात वाढणार आहे. त्याचं सोशल मीडियावर इतकं प्रमोशन होतं की लोकांना वाटतं आपण तिथं गेलं पाहिजे. आपल्या भारताचा, हिंदू धर्माचा श्रद्धा हा गाभा आहे. प्रत्येकाची देवी-देवतांवर श्रद्धा आहे. त्यामुळे आगामी काळातही धार्मिक पर्यटन सातत्यानं वाढणार आहे. आमची मारी गोल्ड ही धार्मिक पर्यटनाची यात्रा नेहमी हाऊसफुल असते, असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world