Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणी विधिमंडळ अधिवेशना मुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे. जिल्हा बालविकास अधिकारी यांचं तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. NDTV मराठीने या बातमीचा पाठपुरावा केला होता. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar News) विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यावेळी या मुलींचा छळ झाल्याचे समोर आले होते.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "ज्या काही अनियमितता बाहेर आल्या आहेत त्या भयानक आहेत. जिल्हा बालविकास अधिकारी तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 80 मुलींची चर्चा केली, आधी त्या बोलत नव्हत्या. मात्र आता त्या त्यांच्यासोबत काय घडलं हे सांगत आहेत. अनेक गंभीर गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत. बालगृह अधीक्षक आणि सगळ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची मान्यता पूर्ण रद्द करण्यात आली आहे. 3 वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक याबाबत चौकशी करत आहेत. उद्या याबाबत अहवाल देणार आहेत. जे कुणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल. हायकोर्ट सुद्धा लक्ष ठेवून आहे, त्यांनी सुमोटो दाखल करून घेतला आहे."
(नक्की वाचा- Beed News: मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं; नातेवाईकही हादरले)
काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून पळालेल्या मुलींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालगृहातील मुलींचे कुठल्याही कारणाने पोट दुखले तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती. मुली आजारी पडल्यावर त्यावर उपचार म्हणून एकाच प्रकारची गोळी दिली जात होती. त्यामुळे मुली अनेक दिवस एकाच आजाराने ग्रासलेल्या राहायच्या. त्यानेदेखील मुली बऱ्या झाल्या नाही तर पवित्र पाणी शिंपडून अथवा शरीरावर वेगळी चिन्हे काढून त्यांना आता तुम्ही बऱ्या व्हाल असा दावा केला जायचा.
विशेष म्हणजे या सर्व आरोपांचा खुलासा सामजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केला आहे. मुलींचा बालकल्याण समितीपुढे जेव्हा जबाब घेण्यात आला त्यावेळी आपण तिथे उपस्थितीत होतो आणि आपल्या समोरच मुलींनी आपली आपबीती सांगितली असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.