संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपूरमध्ये आज (मंगळवार, 3 सप्टेंबर ) तान्ह्या पोळाच्या निमित्तानं एक आगळे-वेगळे आंदोलन झाले. मंगळवारी शाळांना आणि शासकीय कार्यालयांना तान्हा पोळ्याची सुट्टी होती. त्यावेळी लहान मुलांनी मुलांनी क्रिकेट आंदोलन करत महानगरपालिकेच्या आंदोलनाचा निषेध केला. संवेदनशील भागात मुलांनी केलेल्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा आहे.
काय आहे प्रकरण?
दक्षिण नागपूर येथील उंटखाना परिसरात सुमारें दहा हजार स्क्वेअर फुटांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे. या मैदानावर परिसरातील मुले खेळतात शिवाय इथे विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील होत असते.
पण, या मैदनाला महानगरपालिकेनं डम्पिंग ग्राऊंड बनवले. त्यामुळे आम्ही आता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात खेळणार अशी या लहान मुलांनी भूमिका होती. या मुलांनी चक्क महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर क्रिकेट खेळून आंदोलन केले. सिव्हील लाईन्स परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने तिथे अचानक या लहान मुलांना पाहून महानगर पालिकेच्या कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली.
सुरक्षा रक्षकांनी मुलांची चौकशी केली. त्यांना इथे खेळता येत नाही, ही महानगरपालिका मुख्य कार्यालयाची जागा आहे, इथे खेळण्याची मनाई आहे असे समजावून सांगितले. मात्र त्यांना मुलांनी आपण उंटखाना कॉलनी येथे राहतो, आमचे खेळाचे मैदान महानगर पालिकेने कचरा मैदान केले म्हणून खेळायला इथे आलो, आपले मैदान जों पर्यंत साफ करून देत नाहीत तो पर्यंत इथे येऊन खेळू असे मुलांनी धीटपणे सांगितले. त्यांची उत्तरे ऐकून सुरक्षा अधिकाऱ्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन लावले. त्या नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी तिथे क्रिकेट खेळणाऱ्या या लहान मुलांचे आपल्या स्मार्ट फोन वर चित्रीकरण देखील केले.
अर्धा-पाऊण तास खेळ झाल्यानंतर जोराचा पाऊस आल्यानं मुल परतली. मात्र पुढच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही पुन्हा इथंच खेळू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या आंदोलनानं नागपूर महानगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल झाली आहे.
( नक्की वाचा : महायुतीचं ठरलं? जागा वाटपासाठी शिंदे- फडणवीस- पवार एकत्र, नागपुरात मध्यरात्री काय झालं? )
3 वर्षांपासून प्रश्न
गेल्या 3 वर्षांपासूनच इथे महानगर पालिकेच्या लोकांनी, कंत्राटदारांनी बांधकाम साहित्य आणि इतर मलबा, अडगळ टाकायला सुरुवात केली, अशी माहिती उंटखाना परिसरातील ज्येष्ठ नागरिक अनुसुयाबाई ढाकणे यांनी दिली. हान मुले या नव्याने तयार झालेल्या डम्पिंग यार्ड मध्ये खेळायला जातात आणि जखमी होऊन परत येतात. येथील कचरा आणि घाण वासामुळे मुळे आजारी पडतील अशी सतत भीती वाटते, असं सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे यांनी सांगितलं.
आम्ही आणि अन्य नागरिकांनी शहरातील नेते तसंच महानगरापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना बऱ्याच तक्रारी केल्या,पत्रं लिहिली. मात्र या केलेल्या तक्रारीचा परिणाम उलट झाला आणि गेल्या वर्षभरात इथे चक्क डम्पिंग यार्ड झाले. आम्ही अलीकडेच आयुक्तांना भेटलो होतो. त्यांनी आश्वासन दिले तेव्हा वाटले की आता ही समस्या सुटेल, मात्र पुढे काहीच झाले नाही, असं कांबळे यांनी सांगितलं.