मनोज सातवी, पालघर
Palghar News: आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींना 50 हजार ते 1.25 लाख रुपयांत विकून त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर या मुलींचा शारीरिक व मानसिक छळ देखील करण्यात आला आहे. या गंभीर घटनेप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यस्थी करणारा आरोपी रवि कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. वाडा तालुक्यातील इतर कातकरी वाडीमधील अजून चार मुलींची अकोले भागात 1 लाख ते सव्वा लाख रुपये घेऊन लग्न लावून विक्री केली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
( नक्की वाचा : Shocking: 'स्वीटी बेबी डॉल' बोलून चैतन्यानंद बाबा करत होता मुलींचा सौदा; व्हॉट्सॲप चॅटने उघड झाला 'डर्टी' खेळ )
फिर्यादी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न केवळ 14 वर्षांची असताना संगमनेर तालुक्यातील जीवन बाळासाहेब गाडे याच्यासोबत जबरदस्तीने करण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या. तसेच 50 हजार रुपयांची रोख देवाणघेवाण करून मुलीला विकले गेले.
लग्नानंतर काही काळ संसार सामान्य चालला, मात्र 2023 मध्ये पीडितेला जबरदस्तीने गरोदर केले गेले. पती व सासरच्या मंडळींकडून सतत शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता वाढली. पतीने सांगितले, "तुझे लग्न मी 50 हजार रुपये देऊन विकत आणले आहे." यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून जन्मतारीख बदलली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये जीवन बाळासाहेब गाडे (नवरा), अमोल गाडे (चुलत सासरे), बाळासाहेब गाडे (सासरे), दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे. यातील मध्यस्थी करणारा आरोपी रवि कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.