Emerging Business Conclave Pune Chapter :पुणे शहरातून बाहेरच्या देशात जायचं असेल तर थेट विमान नाही. ही पुणेकरांची मोठी खंत आता लवकरच दूर होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच याबाबतची मोठी घोषणा केली आहे. 'NDTV मराठी' च्या Emerging Business Conclave Pune Chapter या कार्यक्रमात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मोहोळ?
पुणे विमानतळावरुन बाहेरच्या देशात विमानं जात नाहीत. त्यासाठी रन-वे मोठा करणे आवश्यक आहे. पुण्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास 300 एकर जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. या भूसंपादनामधील 60 टक्के खर्च राज्य सरकार, 20 टक्के पुणे महापालिका, 10 टक्के पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 टक्के PMRDA खर्च करणार आहे. पुढील दीड वर्षात तुम्हाला पुण्यातून कोणत्याही बाहेरच्या देशात जाणे शक्य होईल, असं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं.
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु
देशामध्ये कुठंही नवीन विमानतळ करायचं असेल तर त्यासाठी जागा राज्य सरकार देते. पुरंदर विमानतळावर जागा कोणती हाच प्रश्न सुरु होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ती जागा निश्चित झाली 2014-19 काळात पुरंदरमध्ये विमानतळ सुरु करण्याचं काम सुरु झालं. पुरंदर विमानतळाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुरंदरला आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ होतंय ही पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
( नक्की वाचा : Emerging Business Conclave : बदलत्या पुणे शहराला काय हवं? 'NDTV मराठी' वर तज्ज्ञ करणार विचारमंथन )
मी जरी देशभर फिरत असलो तरी मला माझ्या शहराचं महत्त्व सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या ऑपरेशनचं काम तातडीनं सुरु झालं. आता 100 टक्के ऑपरेशन हे नव्या टर्मिनलच्या माध्यमातून होत आहे. तसंच जुन्या टर्मिनलचं काम देखील आम्ही सुरु केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
2014 पूर्वी देशात फक्त 74 विमानतळं होती. आज 162 विमानतळं आहेत. ही प्रगती झाली. विमानतळावर प्रवाशांना किफायतीशीर दरात खाद्यपदार्थ देण्यासाठी योजना सुरु झाली आहे. ही योजना सुरु झालेलं पुणे हे देशातील चौथं विमानतळ आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक उत्तम करण्यावर भर आहे. पुण्यात मेट्रो येणार हे स्वप्न पुणेकरांनी वर्षानुवर्ष पाहिलं. ते स्वप्न मोदी सरकारच्या राजवटीमध्ये पूर्ण झालं. आता मेट्रोचे नेटवर्क वाढवणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोहचवणे हे आमचं ध्येय आहे.
पुणे मेट्रो आणि बस एकाच तिकीटीवर प्रवास करु शकेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कुणी काहीही म्हणो आजही आमचं पुणं हे देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे. ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जातंय तितकं पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे चित्र वाईट नाही. टीका करताना आपण आपल्या शहराचे नाव बदनाम करतोय का याचा विचार केला पाहिजे, असंही मोहोळ यांनी सांगितलं.