- मळवली आणि देवले परिसरात सततच्या पावसाळ्यातील पूरामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे
- इंद्रायणी नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नाही आणि पूरस्थिती निर्माण होते
- रेल्वे विभागाकडून केलेल्या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह अरुंद झाल्याने गावांवर पूराचा धोका वाढला आहे
सूरज कसबे
लोणावळा परिसरात मान्सूनची जोरदार चाहूल लागली आहे. मान्सून म्हटला की सर्वांना हवाहवासा वाटतो. सध्या ज्या पद्धतीने सुर्य आग ओकत आहे ते पाहाता सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. असं असलं तरी लोणावळा परिसरातील काही गावांना मात्र या पावसाने चिंतेत टाकले आहे. मळवली आणि देवले परिसरातील नागरिकांना काही गोष्टीची भीती वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागाला पावसाळ्यात सातत्याने पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील नाले, ओढ्यामुळे इंद्रायणी नदीच्या पात्रा गाळ साचला आहे. त्यामुळे तेउथळ झाले आहे. अशा स्थितीत पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यातच रेल्वे विभागाकडून करण्यात आलेल्या नव्या बांधकामांमुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह आणखी अरुंद झाले आहेत. याचा फटका या गावांना बसत आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे देवले-मळवली मार्गावरील अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली होती. रस्ते जलमय झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. याचा मोठा फटका शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना बसला होता. तसेच अनेक वाहने पाण्यात अडकून अपघातांच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे यंदा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचाच धसका मान्सून आधी या गावकऱ्यांनी घेतला आहे. आमच्या नशिबी या वर्षी ही अशीच स्थिती येणार आहे असं ते म्हणत आहेत.
यंदाही तशीच भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाळा तोंडावर आला असून प्रशासनाने तातडीने नालेसफाई करावी, पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. मान्सून गोव्यात दाखल झाला आहे. तो कधी ही संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होवू शकतो.
मळवली- देवले गावातील ग्रामस्थ सांगतात, पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते. त्यातून आम्हाला जावं लागते. आम्हाला त्या शिवाय पर्याय नाही. काही जण सांगतात तर पावसा आधी तातडीने काम केलं नाही तर एक्सप्रेस वे वर ही पाणी जाईल. त्यामुळे तातडीने काम करा. यावेळी पाणी भरपूर साचणार. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा ही संपर्क तुटेल. लोकांना घरी बसावे लागेल. खाण्यापिण्याचे वांदे होतील असं ही गावकरी सांगत आहे. आता मान्सून अगदी उंबरठ्यावर असताना, प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन मळवली आणि देवले परिसराला दिलासा देणार का, याकडे संपूर्ण मळवलीकरांचे लक्ष लागले आहे.