- हरिश्चंद्रगडावर प्लॅस्टिक कचऱ्यामुळे गंभीर प्रदूषण व ढासळती परिस्थिती निर्माण झाली आहे
- शिवनेरी ट्रेकर्सने तीन दिवसांच्या स्वच्छता मोहीमेत 125 हून अधिक प्लॅस्टिक कचऱ्याच्या गोण्या गोळा केल्या
- गडावरील पायवाटा, मंदिर परिसर व जंगलांमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक व दारूच्या बाटल्या टाकल्या
अविनाश पवार
गड- किल्ल्यांचे संवंर्धन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अनेक योजना ही आखल्या आहेत. पण त्या योजना फक्त कागदावरच आहेत का असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. याचे कारण म्हणजे हरिश्चंद्र गडाची सध्याची स्थिती. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेला ऐतिहासिक हरिश्चंद्रगड सध्या प्लॅस्टिकच्या गंभीर विळख्यात सापडला आहे. गडावरील ढासळती परिस्थिती पाहता, 'शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन'च्या वतीने गडावर तीन दिवसीय विशेष दुर्गस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात त्यांना काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या.
या मोहिमेत 55 दुर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या मोहीमे अंतर्गत त्यांनी गडावरून तब्बल 125 हून अधिक गोण्या प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला आहे. गडावरील मुख्य पायवाटा, हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसर, ऐतिहासिक पाण्याची कुंडे आणि सभोवतालच्या जंगल परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा आणि पाण्याच्या बाटल्या टाकल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, गडावर दारूबंदीचे नियम लागू असतानाही, दुर्गप्रेमींना तब्बल 5 ते 6 गोण्या भरून दारूच्या काचेच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे गडाच्या पवित्र्याला आणि सुरक्षेला धक्का पोहोचत असल्याचे चित्र आहे.
या मोहिमेदरम्यान ट्रेकर्सनी केवळ स्वच्छताच केली नाही, तर पाचनई परिसरातील स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी 40 मोठ्या कचराकुंड्यांचे वाटप केले. वन विभागाचे चेकपोस्ट केवळ नावापुरते उरले असून, पुरातत्त्व विभागाचेही या ऐतिहासिक वास्तूकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळेच गडाची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचा संताप शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. गडाचे पावित्र्य राखण्यासाठी आता कठोर उपाययोजनांची गरज आहे असं ही त्यांनी सांगितलं आहे.
सह्याद्रीच्या कुशीतील अतिशय लोकप्रिय आणि ऐतिहासिक हरिश्चंद्रगड सध्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकला आहे असेच चित्र आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन 'शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन' मदतीला धावून आली. पण त्यांना भयान चित्र गडावर पाहायला मिळाला. गड किल्ल्यांचे संवंर्धन करण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. पर्यटकांनी ही आपली जबाबदारी ओळखली पाहीजे. जर आपणच प्लास्टिकचा कचार गडावर टाकणार असू तर कसे होणार असा प्रश्न शिवनेरी ट्रेकर्सच्यावतीने उपस्थित केला जात आहे.