- पुणे जिल्ह्यातील मलठण शाखेतील बँक कर्मचाऱ्याचा शेतकऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
- भीमराव विठोबा पांढरे यांनी बँक कर्मचाऱ्याविरोधात मारहाणीची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे
- बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला जमिनीवर पाडून शिवीगाळ केली आणि मारहाण केली
देवा राखुंडे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मलठण शाखेतील एका कर्मचाऱ्याचा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा कर्मचारी याच बँकेचा असल्याचं ही समोर आलं आहे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओमध्ये मात्र संबंधित बँक कर्मचारी वरिष्ठांकडे तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारताना दिसत आहे. शिवाय अतिशय वाईट भाषेमध्ये त्याला शिवीगाळ देखील करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या कर्मचाऱ्या विरुद्ध तातडीने कडक कारवाई केली जावी अशी मागणी ही केली जात आहे.
मलठण येथील शेतकरी भीमराव विठोबा पांढरे यांनी या बँक कर्मचाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. त्याचा राग मनात धरून दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत समोर आपल्याला या बँक कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार भीमराव पांढरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. बँक कर्मचारी इतका मुजोर कसा असू शकतो? थेट शेतकऱ्याला मारहाण करण्याची हिंमत कशी होते अशी विचारणा होत आहे.
भीमराव विठोबा पांढरे यांनी कर्जाच्या अर्जामध्ये त्रुटी निघाल्याच्या कारणातून बँकेत येऊन शिवीगाळ केली. शिवाय फोनवरून धमकी ही दिल्याचा आरोप संबंधित बँक कर्मचारी अक्षय आटोळे यांनी केला आहे.शिवाय लिंगाळी ग्रामपंचायत समोर आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद आटोळे यांनी दौंड पोलिसात नोंदवली आहे. आता दौंड पोलीस ठाण्यात या दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दौंड पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात बँक कर्मचारी या शेतकऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. बँकेच्या कर्ज प्रकरणातून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. दोघांनी ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला ही वेगळे वळण मिळाले आहे. संबंधीत बँक कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी बँक प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आता दौंड पोलीसां समोर ही सत्या काय आहे हे शोधण्याचे आहे. मात्र शेतकऱ्याला मारहाण होत असेल तर ते चुकीचे आहे अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.