- पुणे शहरात मे महिन्यात जवळपास 49 मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या गेल्या आहेत
- बेपत्ता झालेल्या 49 मुलींपैकी 38 मुलींचा यशस्वी शोध लागून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना परत दिले गेले आहे
- अद्याप उर्वरित 11 मुली बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे
सागर कुलकर्णी
अलीकडच्या काळात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रमाण राज्यात पाहायला मिळत आहे. कुठे ना कुठे मुली गायब होताना दिसत आहेत. या मागची कारणं मात्र वेगवेगळी असल्याचं ही समोर आलं आहे. त्यात आता पुण्यात ही मुली गायब होत असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2026 या एकाच महिन्यात शहराच्या विविध भागांतून जवळपास 49 मुली बेपत्ता झाल्या आहेत. गृह विभागानाच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणांची दखल घेत पुणे पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली आहे. ज्या 49 मुली बेपत्ता झाल्या होत्या त्या पैकी 38 मुलींचा यशस्वीपणे शोध घेण्यात आला आहे. त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुणे पोलीसांनी ही माहिती दिली आहे. या मुली गायब होण्या मागची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र ती कारणे पोलीसांनी देण्यास नकार दिला आहे. मात्र या मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांना पुणे पोलीसांनी नक्कीच दिलासा दिला आहे.
दरम्यान, उर्वरित 11 मुली अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ही चिंतेत आहेत. पुणे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 11 मुली गेल्या 4 दिवसांत बेपत्ता झाल्या आहेत. घटना ताज्या असल्याने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक खबरे यांच्या मदतीने तपास वेगाने सुरू आहे. या मुलींचाही लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात ही मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. मात्र त्यांचा शोध लागला आहे. पोलीसांनी तितक्याच तातडीने कारवाई केली आहे. काही प्रकरणात मुली या प्रेम संबंधामुळे पळून गेल्या आहेत. तर काही मुलींनी फूस लावल्याचं ही दिसून आलं आहे. तर काही मुली या कौटुंबीक वादातून घर सोडून गेल्याचं ही आढळून आलं आहे. घरातील छोटी छोटी भांडणं ही याला कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे पालकांनी ही आपल्या मुलांना विश्वासात घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे.