देवा राखुंडे
सध्या राज्यात पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ प्रकरण चांगलं गाजत आहे.गेल्या दोन दिवसात या प्रकरणावरून पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांवर लाठी चार्ज ही केला. याच मुद्द्यावरून विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. पुण्याच्या पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होऊ पाहत आहे. यासाठी तब्बल 2673 हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे. मात्र या भूसंपादनाला सात बाधित गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासाठी ड्रोन सर्वेक्षणचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी पुरंदरच्या कुंभारवळण परिसरात बाधित गावातील शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह रास्ता रोको करत हा ड्रोन सर्वे हाणून पाडला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस बंदोबस्तात हे ड्रोन सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आलं. याच वेळी 87 वर्षीय अंजनाबाई कामथे या वृद्ध शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने आंदोलन भावनिक झाले. वातावरण चिघळत गेलं आणि पोलिस व आंदोलकांमध्ये चकमक झाली. यात काही पोलीस जखमी झाले. तर काही शेतकरी देखील जखमी झाले आहेत. मात्र शेतकऱ्यांनीच दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केला आहे.
पोलिसांनी केलेल्या या लाठी चार्ज वरून आंदोलकांनी आमदार विजय शिवतारे यांना लक्ष केलं आहे. गुंजवणीचं पाणी आम्हाला देतो म्हणून आमदाराने आम्हाला फसवलं, आम्ही त्यांना निवडून दिलं, मात्र त्यांनी एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला. पूर्वीचे आमदार संजय जगताप यांनी दिल्लीत खलबद करीत हे विमानतळ पूर्वेला प्रस्थापित केलं होतं, पण सरकार बदललं आणि आणि पुन्हा आहे त्याच मूळ जागी हे विमानतळ प्रास्तावित झालं असा आरोप आंदोलन शेतकऱ्यांनी केलाय. याच्या पाठीमागे विद्यमान आमदार विजय शिवतारे असल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केला आहे.
विमानतळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष देखील मैदानात उतरला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट कुंभारवळण गाठलं. पुरंदर पासून अवघे 36 किलोमीटर पुण्याचे विमानतळ आहे. ज्यांना फिरायची फार हौस असेल त्यांनी इथून 60 किलोमीटर अंतरावर बारामतीचे विमानतळ आहे ते मोठे करावे. इकडून तिकडं जायला, गद्दारी करायला तुम्हाला पळावे लागतं, गुपचूप अमित शहा, नरेंद्र मोदी यांना भेटावं लागतं, त्यामुळे बारामतीचे विमानतळ मोठे करा अशा शब्दात अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
पुणे जिल्ह्यत विमानतळ झालं पाहिजे असं जर पालकमंत्र्यांना वाटत असेल तर मग पुण्यातलं विमानतळ काय जिल्ह्याच्या बाहेर आहे का? आज घडीला पुणे विमानतळावरून राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.असं असताना पुरंदर मध्ये विमानतळाचा घाट का घातलाय ? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सध्या पुण्याच्या पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रचंड विरोध होतोय. सरकार हा प्रकल्प करण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाला जमिनी देण्यास बाधित गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.