- पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी झालेल्या वादळी पावसाने नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा
- वादळी पावसामुळे झाडे कोसळली आणि वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होऊन अनेक ठिकाणी कोंडी झाली
- वाल्हेकरवाडी परिसरात झाडे वाहनांवर कोसळल्याने गाड्यांचे नुकसान झाले
सुरज कसबे
उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आज पावसाने दिलासा दिला. पिंपरी चिंचवड शहरात ही आज दुपारी झालेल्या पावसाने नागरिक सुखावले. उष्णतेपासून काही वेळासाठी काहोईना सुटका झाली. मात्र या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यामुळे ऐन ऑफीस सुटण्याच्या वेळेला पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच पावसात खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.
शहराच्या वाल्हेकरवाडी परिसरात एक मोठे झाड उभ्या वाहनांवर कोसळले. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, भोसरी आणि मोशी परिसरातही दोन ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. त्याचा फटका थेट वाहतुकीला बसला. त्यामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ युद्धपातळीवर काम करून झाडे हटवली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी नागरिकांनी झाडांखाली किंवा उघड्या जागेत उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान उकाड्याने पिंपरी चिंचवडवासीय हैराण झाले होते. जवळपास 36 अंश तापमानाची नोंद होत झाली होती. त्यात दुपारच्या सुमारास झालेला हा वादळी पाऊस नागरिकांना दिलासा देवून गेला. पण काही वेळातच सर्वांचीच या पहिलाय पावसाने तारांबळ उडवली.

मुंबई-बेंगलोर महामार्गावर पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू असतानाच अचानक पाऊस आल्याने, वाकड येथील शनी मंदिराजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून वाहने संथ गतीने पुढे जात असल्याने महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, साचलेल्या पाण्याला जवळच्या नाल्यातून वाट काढून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नक्की वाचा - Akola News: '500 रुपयांसाठी 18 एकर शेती पेटवली' प्रकरण ऐकून अंगावर काटा येईल
पाऊस सुरू झाला त्यावेळी ऑफीस सुटण्याची वेळ झाली होती. त्यामुळे अनेक जण ऑफीस आणि त्याच्या आवारात अडकून पडले. पण जे काही लोक बाहेर पडले ते रस्त्यावर अडकल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी ही साचले होते. तर काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेला ही फटका बसला होता. झाडे कोसळण्याच्या घटना ही यावेळी झाल्या. त्यामुळे पहिला पाऊस जसा दिलासा देणारा ठरला तसाच त्याने सर्वांची तारांबळ उडवली हे मात्र नक्की. मात्र या पावसाने शहरात गारवा निर्माण केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world