अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुणे शहरात पावसाचा जोरदार दणका सुरू असतानाच, दुसरीकडे प्रशासनाने महापालिकांच्या शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही सुट्टी फक्त शहरात पडणाऱ्या पावसामुळे देण्यात आलेली नाही.
काय आहे कारण?
पुण्यातील 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे आषाढी वारी आणि सध्या निर्माण झालेली पूरपरिस्थिती हे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या वारीत सामील झाले आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर संकटामुळे आळंदीत अडकलेल्या हजारो वारकरी आणि भाविकांच्या राहण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या अभूतपूर्व संकटात वारकऱ्यांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी पुणे महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत.
( नक्की वाचा : Alandi flood: आळंदीला पुराचा वेढा! पहिल्या मजल्यापर्यंत चढले पाणी; भक्त निवासातून 'त्या' 24 जणांना कसे वाचवले? )
शाळा बनल्या वारकऱ्यांचे हक्काचे घर
आळंदी आणि देहू परिसरातील पुराचा फटका बसलेल्या या वारकऱ्यांची आणि भाविकांची सोय थेट पुणे शहरात करण्यात आली आहे. वारीसाठी पुणे शहरात दाखल होणाऱ्या आणि पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या तब्बल 100 पेक्षा जास्त शाळा तात्पुरत्या निवासस्थानात रूपांतरित करण्यात आल्या आहेत.
या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. याच सामाजिक आणि धार्मिक भान राखत प्रशासनाने या 101 शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा येणार नाही.
( नक्की वाचा : Mumbai Pune Expressway: पुण्याची वाट मोकळी, पण मुंबईचे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती )
यापूर्वी भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी (6 जुलै 2026 रेड अलर्ट जारी केला होता. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली होती.