- गेल्या 20 वर्षांपासून व्हिलचेअरवर बसून पायीवारी करणारे वारकरी पंढरपूरच्या दिशेने
- दिव्यांग वारकरी विठ्ठल भक्तीने उत्साहाने वारी करत असून कोणत्याही अडचणीवर मात करत आहे
- दिव्यांग वारकऱ्यांना इतर वारकरी मदत करताना दिसत आहेत
मिलिंद भागवत
तुकाराम महाराज पालखी मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने सरकत आहे. वाटेत पालखीचे मोठ्या दिमाखात स्वागत होत आहे. भावीकांची दर्शनासाठी झुंबड उडत असताना दिसत आहे. तर पालखीसोबत हजारो वारकरी पुढे मार्गक्रम करत आहेत. यात असे ही वारकरी आहे जे तुम्हाला थक्क करतील. त्या पैकीच एक बेलवडीच्या पालखी तळावर उपस्थित होते. हे वारकरी गेल्या 20 वर्षापासून अविरत पायी वारी करतात. विशेष म्हणजे ते दिव्यांग आहेत. दोन्ही पाय नसताना ही ते पायीवारी सोबत असतात. ही वारी करताना त्यांना कोणतीच अडचण येत नाही. उलट ते उत्साहात, विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असतात.
बेलवडीचा पालखी तळ एक वारकरी बाबा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याला कारण ही तसेच होते. हे बाबा एका व्हिल चेअरवर बसले होते. उत्सुकता म्हणून एनडीटीव्ही मराठीने त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यावर त्यांनी विठ्ठलाची भक्ती कशी असते, दिव्यांग असून ही आपल्याला पायीवारी करण्याची ताकद कशी मिळते हे सांगितले. देहू पासून सुरू झालेली त्यांची ही वारी पंढरपूर पर्यंत असणार आहे. कधी ते स्वत: त्यांची व्हिलचेअर ढकलत असतात. तर कधी वाटेत असलेले वारकरी त्यांच्या मदतीला धावून येतात. कुणी ना कुणी मदतीला धावून येतं असं ही त्यांनी सांगितलं.
गेल्या 20 वर्षापासून ही अखंड पणे आपण वारी करत असल्याचं ते सांगतात. आपण दिव्यांग आहोत याची काही एक अडचण ही पायीवारी करत असताना येत नाही. अवघड घाट ही या वारीत आपण सहज पार करतो. हे आपण नाही तर सर्व काही माऊली करतात. माऊलींचा आशिर्वाद आहे म्हणून या सर्व गोष्टी सहज होतात असा त्यांचा विश्वास आहे. अडचण असेल तर कुणी ना कुणी मदतीला नक्की येते. अडचणीमुळे वारी कधीच थांबत नाही तिला कधीच ब्रेक लागत नाही, लागणार ही नाही असं ही त्यांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे आपल्याला दिव्यांग असताना काहीच त्रास होत नाही. माऊली आपल्या पाठीशी आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
संत तुकाराम महाराज ही आपल्या पाठीशी आहेत. आपण एकाच व्हिलचेअरवर बसून ही वारी करत आहे. 20 वर्षापासून याच व्हिलचेअरची आपल्याला साथ मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं. हीच गाडी आणि वारी असं समिकरण झाल्याचं ही ते म्हणाले. आपली या वारीत एकच मागणी आहे, शेतकरी, कामगार सुखी झाला पाहीजे. दिव्यांग बंधू सुखी राहीले पाहीजे हेच पांडूरंगाकडे मागणे आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वारीत अनेक दिव्यांग आहेत. त्यांना आणखी सुविधा मिळाल्या पाहीजेत. स्वच्छता गृह आणि पाणी याची व्यवस्था अजून चांगली केली पाहीजे असं त्यांनी बोलून दाखवलं. बाकी कोणता ही त्रास वारीत होत नाही असं ही ते म्हणाले. दोन्ही पायांनी चालता न येणाऱ्या या दिव्यांग वारकऱ्यांच्या जिद्दीला आणि भक्तीला सर्वच जण सलाम करत आहेत.