भूपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी
Bhiwandi News : पुण्यात हातभट्टीची दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा बळी गेल्याच्या वृत्तानंतर राज्यभरातील हातभट्टींवर कारवाईची कुऱ्हाड चालवली जात आहे. दरम्यान या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विचित्र मागणी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील आरपीआय शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या शहर शाखेला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
हातभट्टीची दारू शासनमान्य अधिकृत करा - रामदास आठवले...
रामदास आठवले हातभट्टीच्या दारूबाबत म्हणाले, किती ही कारवाया केल्यानंतरही हातभट्टी सहज उपलब्ध होते. त्यासाठी हातभट्टी दारू अधिकृत करा, शासनाचे नियंत्रण राहिल्याने महसूल ही मिळेल. पुणे येथे विषारी दारू प्यायल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मजूर कामगारांचा मृत्यू झाला. हातावर पोट असणारा समाज हातभट्टीची दारू पितात.
याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझं वयक्तिक मत आहे की, हातभट्टीची दारू शासनमान्य अधिकृत करा. ज्यामुळे हातभट्टी ही सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणारी असेल. त्यावर शासनाचे हातभट्टीवर नियंत्रण राहील. शासनाला महसूल मिळेल व गोरगरीब मजूर वर्गाचा जीवही वाचले असा विश्वास व्यक्त केला असून हे माझं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं.