Maharashtra Missing People News : महाराष्ट्रातील 30 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2025 मधील पहिल्या पाच महिन्यातील ही आकडेवारी आहे. पहिल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात 30 हजारांवर लोक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बेपत्ता नागरिकांमध्ये 18 पेक्षा जास्त वयाच्या 12,467 पुरुष आणि 17646 स्त्रियांचा समावेश असून एकूण आकडा 30 हजार 113 असा आहे. 18 वर्षे वयाखालील व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्याची नोंद किडनॅपिंग अंतर्गत केली जाते, हे येथे उल्लेखनीय आहे. पोलीस विभागातील माहितीच्या आधारे ही बातमी समोर आली आहे.
यापैकी सर्वाधिक 3 हजार 473 लोक एकट्या मुंबईतून बेपत्ता झाले आहेत. याच कालावधीत ठाणे शहर येथून 2003 लोक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अहिल्यानगर हे छोटे शहर असून देखील त्याचा माणसे हरवण्याच्या यादीत पहिल्या पाच शहरात समावेश झाला आहे. पाच महिन्यांत तेथून 1,411 बेपत्ता झाले आहेत. पुणे शहर येथून 1364 लोक बेपत्ता झाले आहेत. नाशिक ग्रामीण येथून 1338 लोक बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
सरासरीने विचार केला तर महाराष्ट्रात जानेवारी ते मे 2025 दरम्यान दररोज सुमारे 200 लोक दररोज बेपत्ता झाले, असा याचा अर्थ होईल. यात घर सोडून गेलेले किंवा मानसिक आजारामुळे हरवलेले आणि नैसर्गिक आपत्ती दरम्यान बेपत्ता होऊन अद्याप न सापडलेल्या व्यक्तींचा देखील समावेश आहे.
विदर्भात सर्वाधिक 1069 व्यक्ती नागपूर शहरातून या पाच महिन्यांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात 532 पुरुष आणि 537 स्त्रिया आहेत. या तुलनेत पहिल्या पाच महिन्यांत नागपूर ग्रामीण येथून 581 लोक बेपत्ता झाले.