Titwala Rain : गेल्या पाच दिवसापासून मुंबई-पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर अचानक रस्त्याला भगदाड पडल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याला एवढं मोठं भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली असून वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
रायता पुलावरील वाहतूक बंद...
गेल्या पाच दिवसापासून कल्याण-डोंबिवली, टिटवाळा आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्या मुसळधार पावसामुळे एकीकडे नाले सफाई न झाल्याने लोकांच्या घरात आणि रस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. टिटवाळा येथील रायता पूल हा उल्हास नदीवर असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रात पाणी भरल्याने जल शुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेत पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
मोहिली मोहनी रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान टिटवाळा येथील बल्याणीमध्ये धक्कादायक प्रकार घडला. रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मयूर पाटील यांनी केली आहे.