भूपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी
Bhiwandi News : मुंबई-पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्ते वाहतुकीसह रेल्वेलाही याचा फटका बसला आहे. आज ६ जुलै रोजी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीची परिस्थिती गंभीर झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भिवंडीतील ईदगहा झोपडपट्टी आणि बंदर मोहल्ला परिसरात खाडीचं पाणी थेट घरांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे.
वाढत्या पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत...
शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील संसारपयोगी वस्तू पाण्यात बुडाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाऊस कायम आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक भागातील वीजपुरवठा सुरक्षा कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. अंधारात लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक आपलं सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खाडीचं पाणी अजूनही वाढतंय. वाढत्या पावसामुळे येथील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. वीज गेल्याने संपूर्ण परिसरात अंधार आहे. लहान मुलं आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलंय, पण पाऊस थांबेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणं कठीण आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं, असं आवाहन केलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world