Maharashtra Assembly Session : राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक कबुली मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र विधानपरिषदेत दिली आहे. फक्त नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 अखेरपर्यंत एकूण 5897 जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये महिला व पुरुष 4923 बेपत्ता झाले आहेत, तर 776 मुली व मुले बेपत्ता झाले आहेत.
महाराष्ट्र पोलीस सर्विस फॉर सिटीझेन पोर्टल या संकेतस्थळावर 2024 ते 2025 या कालावधीत 18 वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096 तर 18 वर्षावरील महिलांची संख्या 33599 अशी दर्शवण्यात आली आहे. 2021 ते 2025 या चार वर्षाच्या कालावधीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीचे एकूण 16160 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Maharashtra Alchohol Price: 'बार' चा संप तीव्र होणार? आता वाईन शॉपवालेही टाळी देणार)
राज्यात हरवलेल्या महिला व बालकांना शोधण्यासाठी 'ऑपरेशन शोध' ही विशेष मोहीम प्रत्येक स्तरावर राबवण्यात आली आहे. ही मोहीम हातात घेतल्यानंतर 17 एप्रिल 2025 ते 15 मे 2025 या कालावधीत एका महिन्यात आपण 4 हजार 960 महिला शोधून काढल्या आहेत. 1364 बालके शोधून काढले आहेत. 106 महिला आणि 703 बालके असे होते की ते रेकॉर्डवर नव्हते त्यांची कुठेच तक्रार नव्हती. आता हा सेल सुरू राहील. सगळ्या राज्यासाठी आम्ही एक पोर्टल तयार केलं आहे त्यावर राज्यभरातील माहिती भरली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यात हरवलेल्या महिला व बालकांच्या शोधासाठी 14 ऑपेरेशन राबावण्यात आली. त्यात 41193 लहान मुले व मुली यांचा शोध घेतला गेला. राज्यातील महिला आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.