- राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे
- निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले होते, त्यामुळे शासनाने तातडीने शंभर कोटी रुपयांची तरतूद केली
- फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने मोठा आर्थिक दिलासा मिळाला
राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी'च्या सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले होते. शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली.
मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचेही यावेळी मंत्री सरनाईक यांनी सांगितिले. ही रक्कम जमा केल्या मुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.