ST Ticket Fare : ST चे तिकीट महागणार? डिझेलच्या वाढत्या दरामुळे परिवहन मंत्री मोठ्या निर्णयाच्या तयारीत

इंधनाचे वाढते दर आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता, एसटी प्रवाशांच्या खिशाला लवकरच कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ST Ticket Fare Hike : इंधनाचे वाढते दर आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता, एसटी प्रवाशांच्या खिशाला लवकरच कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीतल्या चिपळूण दौऱ्यावर असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. राज्य शासनाकडून निधी न मिळाल्यास आणि डिझेलचे दर असेच वाढत राहिल्यास नाईलाजास्तव काही 'कटू' निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले आहे.

भाडेवाढ की निधी? निर्णय शासनाच्या हाती

गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, महागाईचा भार अद्याप एसटी प्रवाशांवर पडू नये म्हणून प्रशासनाने भाडेवाढ टाळली होती. याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, "आम्ही राज्य शासनाकडे एसटी महामंडळासाठी विशेष निधीची मागणी केली आहे. जर हा निधी मिळाला, तर प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा टाळावा लागेल. मात्र, जर निधी मिळण्यास अडचणी आल्या आणि डिझेलच्या किमती वाढणे सुरूच राहिले, तर मात्र नाईलाजास्तव आम्हाला भाडेवाढीचा कटू निर्णय घ्यावा लागेल."

Advertisement

नक्की वाचा - Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; FDA च्या इतिहासात पहिल्यांदाच राबवली 'ही' मोहीम

चिपळूण बस स्थानकाच्या कामाला गती

आपल्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मंत्री सरनाईक यांनी चिपळूण बस स्थानकाच्या कामाची पाहणी केली. या बस स्थानकासाठी आवश्यक असलेला पूर्ण निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून प्रवाशांसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण केल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सीएनजी बसेसची देखभाल कठीण, भविष्यात 'इलेक्ट्रिक'चा ध्यास

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सीएनजी बसेसच्या देखभालीचा खर्च सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे वाढला आहे, असेही त्यांनी मान्य केले. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महामंडळाने पर्यावरणपूरक प्रवासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०३५ पर्यंत एसटी महामंडळातील सर्व बसेस इलेक्ट्रिक (Electric) करण्यावर भर देण्यात येत असून, त्या दिशेने वेगाने पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मंत्री सरनाईक यांच्या या विधानामुळे एसटीच्या भाडेवाढीची चर्चा आता रंगली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला आता एसटी प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरच आता प्रवाशांचे 'तिकीट' अवलंबून असणार आहे.