Thane Metro News: ठाणे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून येत्या काळात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरकरांचा प्रवास अतिशय वेगवान आणि सुखाचा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मेट्रो जाळ्याचा मोठा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आता थेट टिटवाळा आणि बदलापूरपर्यंत मेट्रो धावणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीए मुख्यालयात घेतलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत.'लोकसत्ता'नं याबाबतचे वृत्त दिले आहे. या विस्तारामुळे मुंबई आणि नवी मुंबई गाठणे आता प्रवाशांसाठी केवळ काही मिनिटांचा खेळ ठरणार आहे.
मेट्रो 5 चा टिटवाळा आणि बदलापूरपर्यंत विस्तार
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार आता अधिक व्यापक स्वरूपात केला जाणार आहे. मेट्रो 5 अ ही मार्गिका दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगर आणि त्यानंतर थेट अंबरनाथ-बदलापूरच्या मध्यभागी असलेल्या चिखलोली रेल्वे स्टेशनपर्यंत नेली जाईल.
इतकेच नाही तर, मेट्रो 5 ब अंतर्गत चिखलोली ते बदलापूर आणि मेट्रो 5 क च्या माध्यमातून दुर्गाडी ते थेट टिटवाळा असा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे कल्याणच्या पलीकडे राहणाऱ्या लाखो नागरिकांना ठाणे आणि मुंबईशी थेट मेट्रोच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )
कळवा आणि मुंब्र्यातून धावणार पहिली मेट्रो
कल्याण-तळोजा मेट्रो 12 चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, आता या मार्गिकेचा विस्तार कळवा आणि मुंब्रा परिसरातही केला जाणार आहे. मेट्रो 12 ब या नवीन आराखड्यानुसार, ही मेट्रो शिळफाटा मार्गे मुंब्रा आणि कळवा येथून पुढे थेट ठाण्याला जोडली जाईल. यामुळे मुंब्रा-कळवा पट्ट्यातील प्रवाशांना पहिल्यांदाच मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच, कल्याण फाटा ते दहिसर मोरी मार्गे तळोजा या मेट्रो 12 अ मार्गिकेला आधीच मंजुरी मिळाली असून त्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
जिल्ह्यात उभारले जाणार डबल डेकर प्रकल्प
ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील बहुतांश मेट्रो मार्गिका आता 'डबल डेकर' स्वरूपात असतील. यामध्ये सर्वात खाली रस्ता, त्यावर फ्लायओव्हर आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असे या प्रकल्पांचे स्वरूप असेल. मेट्रो 12, मेट्रो 14 आणि मेट्रो 5 च्या विस्तारित मार्गिकांसोबतच शिळफाटा-रांजणोली आणि वालधुनी-नेवाळी हे उन्नत मार्गही याच पद्धतीने विकसित केले जाणार आहेत. यामुळे जमिनीचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त वाहतूक क्षमता निर्माण केली जाईल.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
एक्सेस कंट्रोल मार्गांमुळे शहरांची वेगवान जोडणी
केवळ मेट्रोच नाही, तर रस्ते वाहतुकीतही मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली या शहरांना थेट मुंबई-नवी मुंबईशी जोडण्यासाठी एक्सेस कंट्रोल मार्गांची उभारणी केली जाणार आहे. बदलापूर-काटई मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. मेट्रो 14 ही मार्गिका देखील या एक्सेस कंट्रोल रस्त्याला जोडली जाणार असल्याने, प्रवाशांना रस्ते आणि मेट्रो अशा दोन्ही माध्यमांतून जलद प्रवासाची सोय उपलब्ध होईल.