देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?

पुण्यातील कल्याणीनगर अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement
Read Time: 3 mins

पुण्यातील कल्याणीनगर अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याआधी अल्पवयीन मुलाने दारु प्यायल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले आहे. या प्रकरणी पोलिसांना मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक केली आहे. या घटनेची संपूर्ण देशभर चर्चा सुरु आहे. याआधी देखील अशा अपघाताच्या काही अपघाताच्या घटना होत्या, ज्यांची चर्चा देशभर झाली होती, यावर एक नजर टाकुया.  

सलमान खान हिट अँड रन प्रकरण

28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खानने दारुच्या नशेत भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं होतं. वांद्रे येथील या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता, तर चारजण जखमी झाले होते. या घटनेचे देशभर चर्चा होती. सलमान खानने देखील या घटनेचा उल्लेख 'काळी रात्र' असा केला होता. तब्बल 13 वर्ष या प्रकरणाचा खटला चालला. त्यानंतर 2015 साली पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.

Salman khan Hit and Run Photo

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष माने प्रकरण

2012 साली देखील अपघाताच्या एका घटनेने पुणे हादरलं होतं. संतोष माने या पीएमटी चालकाने 9 जणांना चिरडलं होतं. 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट संतोष मानेने बेदरकारपणे बस पळवत 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते. संतोष मनोरुग्ण असल्याचा दावा देखील त्याच्या वकिलांना कोर्टात केला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी संतोष मानेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याआधी हायकोर्टाने संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती.  

(नक्की वाचा- 'पोर्शे कारनं ज्याने दोघांना चिरडलं, त्यालाच बर्गर-पिझ्झा दिला')

जान्हवी गडकर प्रकरण 

जान्हवी गडकर नावाच्या एका महिलेने 9 जून 2015 रोजी मद्यधुंद अवस्थेत आपल्या ऑडी कारने दोघांचा जीव घेतला होता. वकील असलेल्या जान्हवी गडकरने ईस्टर्न फ्री-वेवर एका टॅक्सीला आपल्या कारने जोरदार धडक दिली होती. धडक इतकी जोरदार होती की ऑडी कार आणि टॅक्सीचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. यामध्ये टॅक्सी चालक आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असून जान्हवी जामिनावर बाहेर आहे. जान्हवीचा वाहन परवाना आधी कायमचा रद्द करण्यात आला होता. नंतर तो देखील पूर्ववत करण्यात आला.

Advertisement

ॲलिस्टर अँथनी परेरा प्रकरण

12 नोव्हेंबर 2006 रोजी ॲलिस्टर अँथनी नावाच्या 21 वर्षीय तरुणाने सात जणांना चिरडलं होतं. हॉटेलमध्ये पार्टी करून परेरा आपल्या मित्रांसह घरी परतत असताना कार्टर रोडवर झोपलेल्या बांधकाम मजुरांना त्याने रात्रीच्या वेळी चिरडलं होते. सत्र न्यायालाने या प्रकरणी परेराला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षेत बदल करुन तीन वर्ष केली होती. त्यानंतर परेराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर 2007 मध्ये परेराला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. 

(नक्की वाचा - रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड)

संजीव नंदा प्रकरण

संजीव नंदा याने 1999 साली तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सहा जणांना आपल्या कारने उडवलं होतं. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. मात्र अपघातानंतर संजीवने तिथे न थांबता घटनास्थळावरुन पळ काढला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने संजीवला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालाने संजीवच्या शिक्षेत बदल करुन दोन वर्ष केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाची शिक्षा कायम राखत 50 लाखांचा दंड ठोठावला होता. तसेच दोन वर्ष समाजकार्य करण्याचेही आदेश दिले होते.

Advertisement

नूरिया हवेलीवाला प्रकरण

नूरिया हवेलीवाला या अनिवासी भारतीय (NRI) महिलेने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एका पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना चिरडलं होतं. 30 जानेवारी 2010 रोजी आपल्या एसयूव्ही कारने नूरियाने मरीन लाईन्स चेक पोस्टवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला आणि एका दुचाकी चालकाला उडवलं होतं. या प्रकरणी सत्र न्यायालयाने नूरियाला दोषी ठरवत 5 वर्षांचा शिक्षा सुनावली होती. गेल्याच वर्षी जून महिन्यात नूरियाचं दीर्घ आजाराने निधन झालं.