अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan News : दोन अल्पवयीन तरुणांमुळे कल्याणमध्ये दोन गट आमने-सामने आल्याची घटना समोर आली आहे. या मुलांना मारहाणही करण्यात आली आहे. हा राडा सो़डविण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा बीपी वाढल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ आली. या सर्व प्रकारामुळे कल्याणमधील कोळसेवाडी भागात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.
अल्पवयीन मुलांवर काय आहेत आरोप?
या दोन अल्पवयीन मुलांवर छेडछा़डीचा आरोप होत आहे. याशिवाय त्यांच्यावर आधी गाडीला कट मारल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय ही दोन्ही मुलं अल्पवयीन असताना गाडी कशी चालवित याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दुसरीकडे मुलांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतू या रा़डा प्रकरणामुळे दीड तास कल्याण पूर्वेतील शंभर फूटी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.
दोन गट आमने-सामने...
कल्याण पूर्वेतील शंभर फूटी रस्त्यावर महिला तिच्या नातेवाईकांसोबत बाईकवरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकी स्वारांसोबत वाद झाला. आधी या दुचाकी स्वारांनी कट मारला असे सांगितले गेले. त्यानंतर या दोघांनी त्या महिलेची छेड काढली असा आरोप केला. महिलेने तिच्या समर्थकांना घटनास्थळी बोलावून घेतले. याच दरम्यान अल्पवयीन तरुणांनी काही समर्थकांना बोलावून घेतले. त्या ठिकाणी दोन्ही गट आमने सामने आले. दोन गटात जोरदार राडा झाला. या राड्यामुळे कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोडवर वाहतूक कोंडी झाली.
पोलीस कर्मचाऱ्याचा वाढला बीपी...
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राडा सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक पोलीस कर्मचाऱ्याचा बीपी वाढला. त्याला त्वरीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी त्या अल्पवयीन तरुणांच्या विरोधात महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना महिलेच्या समर्थकांनी त्या दोन तरुणांना मारहाण केली असल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे. प्रश्न असा आहे की, या दोन तरुणांनी खरेच काय केले असेल तर त्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. परंतू रस्त्यात समर्थकांना बोलावून राडा करणे, पोलिसांना मारहाण करणे आणि लोकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? त्यांच्या विरोधात पोलीस ठोस कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.