Ulhas River pollution : कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. लाखो लोकांची जीवनवाहिनी ठरणाऱ्या उल्हास नदीतील पाण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो असं निष्कर्ष समोर आला आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ संलग्न पीएचडी संशोधनातून ही बाब उघड झाली असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
उल्हास नदीच्या पाण्यातील धातू कर्करोगजन्य...
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हास नदीतील पाणी आणि गाळातील प्रदूषणात क्रोमियम आणि निकेल यासारखे धातू आढळले असून जे कर्करोगजन्य असल्याचं समोर आलं आहे. डॉ. अक्षय बोटले या तरुणाने याबाबत संशोधन केलं आहे. अक्षय याने वर्षभर दर महिन्याला उल्हास नदीच्या कर्जत येथील चोची गावापासून साधारण १२२ किलोमीटरच्या प्रवाहादरम्यान १० वेगवेगळ्या ठिकाणांहून नदीच्या मध्यभागातून पाणी आणि नदीशेजारीला माती-गाळ याचे नमुने एकत्र केले. अशा १२० नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीत धक्कादायक बाब उघडकीस आली. यानुसार, उल्हास नदीत आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, तांबे, पारा, निकेल, शिसे, जस्त, लोखंड आणि मॅगनीज असे जड धातू आढळून आले. महत्त्वाचं म्हणजे या पाण्यात क्रोमियम, तांबे, पारा आणि निकेल याचं प्रमाण अतिरिक्त आहे. दीर्घकाळ या पाण्याचा वापर केल्यास त्वचारोग, अवयवांवर परिणाम याशिवाय कर्करोगाचा धोका वाढू शकतो असंही अक्षय याने म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयायोजना आवश्यक...
उल्हास नदीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. उल्हास नदीतील जड धातू कमी करण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. उल्हास नदीत प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाल्याचं डॉ. अक्षय याचं म्हणणं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world