वैष्णवीच्या चारित्र्यावरच भर कोर्टात संशय घेतला गेला. त्यानंतर वैष्णवीच्या वडीलांनी प्रसार माध्यमां समोर येत सर्व आरोप फेटाळले आहे. शिवाय लेकीच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला. हे सर्व थांबवा. मुलगी तर हातून गेली. आता तिची बदनामी करू नका, असं हात जोडून सांगताना तिचे वडील भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. शिवाय त्यांनी हगवणे कुटुंब आपल्या बरोबर कसे वागले याचा पाढाच माध्यमां समोर मांडला. त्यात काही धक्कादायक गोष्टी ही त्यांनी सर्वां समोर आणल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपीचे हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांनी केलेला हा आरोप वैष्णवीच्या वडीलांनी फेटाळला आहे. हगवणे कुटुंबाने केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आहे. त्यांना तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत असं तिचे वडील म्हणाले.
वैष्णवी मोबाईलवर अन्य कोणा सोबत बोलत होती. याची कोणती ही कल्पना तिच्या सासरच्या लोकांनी आपल्याला कधी ही दिली नाही. त्याबाबत बोलणं ही झालं नाही. त्यांच्याकडून जे सांगितलं जात आहे ते खोटं आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. चॅटींग बाबत चारित्र्यावर संशय घेतला आहे, अत्यंत्य वाईट आहे. माझ्या मुलीला मीच मोबाईल घेवून दिली होता. शिवाय जावयाला ही दोन महिन्यात दिड लाखाचा मोबाईल आपणच दिलाहोता. त्याचे हाफ्ते आपण आजही भरत आहे असं त्यांनी सांगितलं. शिवाय त्याची बीलं ही त्यांनी दाखवली.
हुंड्यासाठी छळ केला नाही असं हगवणेचे वकील म्हणतात. पण त्यांनी आपल्याला हुंड्यासाठी प्रचंड दाबाव टाकला होता. फॉर्च्यूनर गाडीच पाहीजे असं त्यांनी मला सांगितलं होतं. दुसरी गाडी दिली तर जाळून टाकीन असं ही धमकावलं होतं. त्यामुळे आपण त्यांना ती गाडी दिली. त्यांच्याकडे पाच कोटींची गाडी आहे असा दावाही त्यांच्या वकीलांनी केला होता. तो दावाही वैष्णवीच्या वडीलांनी खोडून काढला आहे. त्यांच्याकडे गाडी वैगरे काही नाही. मी दिलेली गाडीच त्यांच्याकडे आहे. एकच गाडी त्यांच्याकडे होती. शिवाय हुंड्यासाठी ऐन वेळी लग्नाला उभं राहाणार नाही अशी धमकी दिल्याचे वैष्णवीच्या वडीलांनी यावेळी सांगितले.
निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काही संबध नाही असं त्यांचे वकील म्हणतात. पण तो ही या प्रकरणात सहभागी आहे. त्यांने आपल्याला ज्यावेळी वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी गेलो होतो त्यावेळी पिस्तुलीचा धाक दाखवला होता असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसात असलेल्या त्याच्या मामाच्या जिवावर ते आपल्याला धमकावत होते. त्यातूनच दोन कोटीची मागणी ही लग्नानंतर करण्यात आली. जावई शशांक तशी धमकी घरी येवून देवून गेला होता. असं सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळले. आता ते काही आरोप करतील. काही ही शिंतोडे उडवतील. त्यांचे वकील सुज्ञ असतील. त्यांना ही मुलीबाळी असतील. माझी मुलगी तर गेली आहे. त्यानंतर असे शिंतोडे उडवताय. लेकराची बदनामी करु नका अशी विनंती वैष्णवीच्या वडीलांनी केली.