वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज आयोजित विशेष सभेत अपेक्षेप्रमाणे बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. महापौर पदासाठी झालेल्या मतदानात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अजीव यशवंत पाटील यांची बहुमताने निवड झाली. त्यांना विजय घोषित करताच सभागृहात बविआच्या 'शिट्टी' या चिन्हाचा जयघोष आणि शिट्ट्यांचा आवाज गुंजला.
निवडणुकीचे समीकरण आणि उमेदवार
महापौर पदासाठी रिंगणात अनेक उमेदवार होते, मात्र मुख्य लढत बविआ आणि भाजपमध्ये झाली. बविआकडून अजीव यशवंत पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी अर्ज भरले होते. त्यांच्या विरोधात भाजपच्या अॅड. दर्शना त्रिपाठी-कोटक रिंगणात होत्या.
(नक्की वाचा- Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
उपमहापौर पद
बविआकडून मार्शल डॉमनिक लोपीस आणि कन्हैया भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या वतीने नारायण मांजरेकर नशीब आजमावत होते.
हितेंद्र ठाकूर यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करताना वसई-विरारमधील सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशकता जपल्याचे दिसून येत आहे. अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांच्या रूपाने विविध समाजाला प्रतिनिधित्व देऊन आगामी निवडणुकांसाठी पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे.
(नक्की वाचा- Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! लातूर दौरा रखडला)
आजच्या विशेष सभेची सुरुवात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीने झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. शेवटी झालेल्या मतदानात भाजपच्या उमेदवारांना पराभूत करत बहुजन विकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला. या निवडीनंतर पालिकेच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.