विदर्भातील तापमानाचा पारा वाढलेला असताना आणि उष्णतेच्या लाटेचे चटके बसत असताना अखेर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विदर्भातील शाळा आता नियोजित 15 जूनऐवजी 22 जून पासून सुरू होणार आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
नवे वेळापत्रक आणि कामकाजाचे स्वरूप
22 जून ते 30 जून : या कालावधीत शाळा केवळ सकाळच्या सत्रात (Morning Session) भरवल्या जातील. दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
1 जुलैपासून : शाळांचे कामकाज नेहमीप्रमाणे नियमित वेळेत सुरू होईल.
विदर्भ वगळता : राज्यातील उर्वरित भागांतील शाळा मात्र 15 जूनपासूनच पूर्ववत सुरू होणार आहेत.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
शिक्षक संघटनांची मागणी आणि न्यायालयीन लढा
विदर्भातील कडाक्याच्या उष्णतेमुळे शाळा 15 जूनऐवजी 26 जूनपासून सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी विविध शिक्षक आणि पालक संघटनांनी केली होती. मात्र, सुरुवातीला सरकारकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शिक्षक संघटनांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने शाळा उशीरा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
(नक्की वाचा- Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)
पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 42 ते 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा स्थितीत दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परतणे जोखमीचे ठरू शकले असते. सरकारच्या या निर्णयामुळे मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे.