भूपेंद्र आंबवणे
अन्न आणि औषध प्रशासनाकडून सध्या धडक मोहीम राबवली जात आहे. लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचेल अशा अन्न धान्यावर थेट बंदीची कारवाई केली आहे. जनतेचं आरोग्य पहीले अशी भूमीका एफडीएने घेतली आहे. असं असतानाच एक धक्कादायक प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेल्या भाज्या काही लोक थेट बाजारात विकत असल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. असा प्रकार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे. या विरोधात भिवंडीचे नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी आवाज उठवला आहे.
भिवंडीतील डम्पिंग ग्राऊंडवर भिवंडी शहरा बाहेरील ऑनलाईन विक्री केंद्रावरील खराब व टाकाऊ झालेला भाजीपाला टाकला जातो. काही डंपर हा भाजीपाला भिवंडीच्या डम्पिंग ग्राऊंडवर घेवून येतात. हाच भाजीपाला कचरा वेचणारे लोक गोळा करतात. त्यानंतर त्याचे वाटे तयार करतात. तोच भाजीपाला ते स्वस्त दरात विकतात. हे विकत घेणाऱ्यांमध्ये गरीब लोकांची संख्या जास्त आहे. मात्र हा खराब भाजीपाला विकून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. याकडे कोणाचे ही लक्ष नाही.
अशात स्थानिक नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी डम्पिंग ग्राऊंडवर आलेल्या दोन गाड्या अडवल्या. त्यांची चौकशी ही केली. त्यात हा शहरा बाहेरील टाकाऊ भाजीपाला असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हा भाजीपाला उचलून काहींना विकत आहेत. हा भाजीपाला झोपडपट्टीत स्वस्तामध्ये त्याचे वाटे लावून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. हा सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा आरोप रोहिदास वाघमारे यांनी केला आहे. याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न ही त्यांनी केला आहे.
यामागे काही पालिका अधिकारी हप्ते घेऊन हे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे राज्यात ठिकठिकाणी कारवाया करत आहेत.असे असताना या ठिकाणी सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. जर खराब भाज्या बाजारात विकल्या जात असतील तर तो भयंकर प्रकार आहे. याला तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे. शिवाय हे बाहेरून येणारे डंप्मर कोणाचे आहेत याचा ही तपास होण्याची गरज आहे. दरम्यान अशा भाज्या जर कुठे विकल्या जात असतील तर त्या खरेदी करू नये असा आवाहन करण्यात आले आहे.