Virar News: नालासोपारा आणि विरार परिसरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विरार पश्चिमेकडील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या 'ग्लोबल सिटी' परिसरातील कल्पवृक्ष कॉम्प्लेक्समध्ये एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीसह मिळून ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मयत महिलेचे नाव आरती असून ती मूळची बिहारची रहिवासी आहे. हे कुटुंब परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत राहत होते. पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांनी संगणमत करून आरतीला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना आरतीचे डोके जोरात भिंतीवर आपटण्यात आले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
सुपरवायझरमुळे उघडकीस आले प्रकरण
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या साइट सुपरवायझरला मुन्नाच्या हालचालींवर संशय आला. सुपरवायझर घटनास्थळी पोहोचला असता, त्याला आरती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तोपर्यंत आरोपी पती मुन्ना, त्याची दुसरी पत्नी मीरा आणि मुलांसह तिथून पसार झाला होता. हे सर्वजण मूळचे बिहारचे असल्याने ते तिथे पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी मुन्ना हा मूळचा बिहारचा असल्याने तो रेल्वेमार्गे पळून गेल्याचा संशय आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
आरोपीचा शोध सुरु
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा-बोळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने जमा केले आहेत. आरोपी मुन्ना आणि मीरा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.