
बेंगळुरु: कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष करताना मोठी दुर्घटना घडली. बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने हा मोठा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून यावर आता आरसीबीच्या संघाकडून विराट कोहलीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. "आज दुपारी संघाच्या आगमनाच्या वेळी बेंगळुरूमध्ये लोकांच्या गर्दीमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आरसीबी या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त करते आणि पीडित कुटुंबांना मनापासून संवेदना व्यक्त करते. परिस्थितीची कल्पना होताच आम्ही तातडीने आमचे वेळापत्रक सुधारित केले आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, 18 वर्षानंतर आयपीएलचा किताब जिंकल्याने आरसीबीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता. कर्नाटक सरकारसह आरसीबीकडून बेंगळुरुमध्ये विजयी मिरवणुकीचे जंगी नियोजन करण्यात आले होते. यावेळी उत्साही चाहत्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बोरिंग रुग्णालयाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत 11 जणांचा मृत्यू आणि 33 जण जखमी झाल्याची पुष्टी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये भरपाई आणि जखमींना सरकारकडून मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world