- टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत तीन पैकी दोन सामने गमावले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे
- आयर्लंडविरुद्धची मालिका ही भारतीय संघाने गमावली आहे
- ऑलिम्पिक 2028 मध्ये थेट पात्रतेसाठी आशिया खंडात भारत सध्या सर्वोच्च क्रमांकावर आहे
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया पाच टी 20 सामने खेळणारा आहे. सध्या तीन सामने झाले असून दोन सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकाराला लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहीला आहे. त्या आधी आयर्लंड विरुद्धची मालिकेत ही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी चिंताजनक राहिली आहे. या खराब कामगिरीमुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मधील भारताच्या थेट प्रवेशाला खीळ बसेल का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
असं असलं तरी तांत्रिक समीकरणांचा विचार केला असता, ऑलिम्पिकच्या थेट पात्रतेच्या शर्यतीत भारतीय संघ आजही आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार, ऑलिम्पिक 2028 मध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत प्रत्येक महाद्वीपातील सर्वोच्च मानांकन (Continental Ranking) असलेला संघ पात्र ठरेल. यजमान म्हणून अमेरिका थेट पात्र ठरणार आहे. तर आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशनिया या महाद्वीपांतून प्रत्येकी अव्वल 1 संघ निवडला जाणार आहे.
सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत भारत 270 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 240 गुणांसह 6 व्या स्थानावर आहे. आशिया खंडात भारताखालोखाल पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. थेट ऑलिम्पिक तिकिटासाठी पाकिस्तानला भारताला मागे टाकावे लागणार आहे. तरच त्यांना ऑलिम्पिकमध्ये खेळता येईल. मात्र,2026 च्या अखेरपर्यंत भारताला आणखी 19 टी-20 सामने खेळायचे आहेत. तर पाकिस्तानकडे केवळ 4 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे गुणांचे गणित पाहता भारताचे पारडे जड आहे.
पाकिस्तानला थेट पात्रतेऐवजी 2027 मधील 'ग्लोबल क्वालिफायर' फेरीचा सामना करावा लागण्याची चिन्हे अधिक आहेत. ऑलिम्पिकमधील 6 जागांपैकी 5 जागा 31 डिसेंबर 2026 पर्यंत निश्चित होतील. तर शेवटच्या एका जागेचा फैसला क्वालिफायर फेरीतून होणार आहे. त्यामुळे इंग्लंड विरूद्ध स्विकाराव्या लागलेल्या पराभवाचा तेवढा परिणाम टीम इंडियावर होणार नाही. सध्याच्या स्थिती आशिया गटातून टीम इंडियाच ऑलिम्पिकसाठी प्रबळ दावेदार आहे.