India vs Zimbabwe: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेला टी-२० मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. मालिका आधीच जिंकलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात यजमान संघाला ३५ धावांनी पराभूत केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच क्लीन स्वीप ठरला. यावेळी, धावा आणि बळींमध्ये आघाडीवर असलेले वैभव सूर्यवंशी आणि मयंक यादव विजयाचे नायक ठरले. वैभवने सामनावीर पुरस्कारासोबतच मालिकावीर पुरस्कारही पटकावला.
टीम इंडियाकडून व्हाईटवॉश, वैभव सुर्यवंशीचा धमाका
मालिकेचा अंतिम सामना रविवार, २६ जुलै रोजी हरारे येथे खेळला गेला. केवळ एक दिवस आधी भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे क्लीन स्वीपची संधी होती, टीम इंडियाने हे आव्हानही सहज पार केले. सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत १९३ धावा केल्या. भारतीय संघाच्या दमदार खेळीचा वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा स्टार ठरला.
पहिल्या सामन्यात १९ चेंडूंमध्ये ५० धावा करणाऱ्या वैभवने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ८१ धावा करत मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने १५१ धावा करत मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मानही मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यर (२७) आणि रिंकू सिंग (२५ नाबाद) यांनीही या डावात जलद धावा करून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. झिम्बाब्वेसाठी ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक दोन बळी घेतले.
मयंक यादवचा जलवा
झिम्बाब्वेची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली, वेगवान गोलंदाज मयंक यादवने सलामीवीर ब्रायन बेनेटला पहिल्याच चेंडूवर बाद केले. यानंतरही झिम्बाब्वेची परिस्थिती बिकटच राहिली. यश ठाकूरने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले, ज्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याचाही समावेश होता, ज्याला आपले खातेही उघडता आले नाही. केवळ ६५ धावांत चार गडी गमावल्यानंतर, झिम्बाब्वेसाठी रायन बर्ल आणि वेस्ली माधेवेरे (२८) यांनी ६० धावांची भागीदारी केली, पण खेळाचा वेग मंद होता आणि सामना झिम्बाब्वेच्या हातून निसटला.
बर्लने (५४ नाबाद) आपले अर्धशतक पूर्ण केले, पण संघ २० षटकांत केवळ १५७ धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि ३५ धावांनी पराभूत झाला. भारतीय संघाकडून मयंकने २९ धावांत तीन बळी घेतले, तर यश ठाकूरनेही दोन बळी घेतले. या सामन्यासाठी संघात पुनरागमन केलेल्या अशोक शर्मानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला बळी घेतला.
Pune News: लग्नासाठी वडिलांनी आधार कार्डमध्ये केला घोटाळा; मुलीच्या एका कॉलने खळबळ