Women's ODI World Cup Final Navi Mumbai Weather Report 2025: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात हा थरार पाहायला मिळेल. हा अंतिम सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे, कारण विश्वचषकाच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यामुळे महिला क्रिकेटला एक नवा विश्वविजेता मिळणार आहे.
क्रिकेटप्रेमींना सामन्याची उत्सुकता लागली असतानाच पावसाने टेन्शन वाढवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पाऊस कोसळत असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजही पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे आजच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास, नेमका नियम काय असेल आणि विश्वचषकाची ट्रॉफी (Trophy) कोणाला मिळणार, याबाबत माहिती समोर आली आहे.
World Cup Final : 'एक मॅच आणखी...' फायनलपूर्वी जेमिमा रॉड्रिग्सचं VIRAL भाषण, टीम इंडियात भरला जोश
आज नवी मुंबईत ६३% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन सामन्यांमध्येही पावसामुळे खेळात व्यत्यय आला होता. मात्र, अंतिम सामन्यासाठी आयसीसीने खास नियम ठेवले आहेत. अंतिम सामना नियोजित वेळेपासून १२० मिनिटांपर्यंत वाढवता येऊ शकतो. नियोजित दिवसाचा खेळ पूर्ण न झाल्यास, त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
सामन्याचा निकाल लागण्यासाठी, दोन्ही संघांना किमान २० षटके फलंदाजी करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. जर नियोजित दिवशी २० षटके पूर्ण करणे शक्य नसेल, तर खेळ मागील दिवसाच्या शेवटच्या स्थितीपासून राखीव दिवशी पुन्हा सुरू होईल. राखीव दिवसानंतरही जर सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेते (Joint Winners) म्हणून घोषित केले जाईल. आजचा सामना भारतीय महिला संघ जिंकून प्रथमच विश्वचषकावर नाव कोरणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.