
IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावत 18 वर्षांचा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरूने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल आरसीबी संघाचे माजी मालक विजय मल्ल्या यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. विजय मल्ल्याने संपूर्ण संघाचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. विजय मल्ल्याने त्यांच्या एक्स-अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत 'ई साला कप नाम दे' असे खास ट्वीट केले आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजय मल्ल्याने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर 18 वर्षांनी आयपीएल चॅम्पियन बनला आहे. 2025 ची ही आयपीएल स्पर्धा आरसीबीसाठी खूप चांगली होती'. विजय मल्ल्याने पुढे लिहिले की 'उत्कृष्ट कोचिंग आणि सपोर्ट स्टाफ असलेल्या संतुलित संघाने धाडसी खेळ केला आहे. खूप खूप अभिनंदन! ई साला कप नामदे'.
तसेच "जेव्हा मी आरसीबीचा संघ तयार केला तेव्हा माझे स्वप्न होते की आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूला यावी. मला तरुणपणी किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले आणि तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या मिस्टर 360 एबी डिव्हिलर्सची निवड करण्याचा मानही मला मिळाला. शेवटी, आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आयपीएल ट्रॉफीचे हकदाप आहेत," असेही विजय मल्ल्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : IPL 2025 Final : आयपीएल फायनलमध्ये विराट कोहलीनं केला मोठा रेकॉर्ड, एक फोर लगावत रचला इतिहास!)
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे अभिनंदनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मात्र विजय मल्ल्याची चांगली फिरकी घेतली आहे. तुमचे स्वप्न पूर्ण झाले आता तुम्ही एसबीआयचे स्वप्न पूर्ण करा, असं एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर आणखी एकाने सर आता भारतात या आणि तेवढे पैसे द्या, अशीही मागणी केली आहे. तसेच आणखी एकाने बँक बंद असताना कसे ट्वीट करता असे मजेशीर कमेंट्सही केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world