उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 65 वर्षीय अभिमान तावडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यांना डेथ सर्टिफिकेटही देण्यात आलं. घरात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती. दरम्यान त्याच वेळी अभिमान तावडे यांच्या हृदयाची धडधड सुरू झाली आणि सर्वांना धक्काच बसला. यानंतर त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तावडे चक्क शुद्धीवर आले.
तावडेंसोबत नेमकं काय घडलं?
तावडे यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठिक नव्हती. घरी असताना अचानक ते बेशुद्ध झाले. यानंतर मुलाने त्यांना रिक्षाने उल्हासनगरमधील शिवनेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉ. आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाकडून त्यांना डेथ सर्टिफिकेटही देण्यात आलं. नातेवाईकांनी अभिमान यांना घरी नेलं. घरात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती. मात्र दरम्यान अभिमान यांच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. यानंतर तातडीने त्यांन उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि अभिमान तावडे शुद्धीवर आले. यानंतर शिवनेरी रुग्णालयावर संताप व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा - Ghatkopar station : घाटकोपर स्टेशन प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या प्रवासी बचावला का?
दरम्यान या प्रकरणा डॉ. आहुजा यांनी आपली चूक मान्य केली आहे. रुग्णवाहिकेत रुग्णाची नस मिळाली नाही. त्याशिवाय आजूबाजूला गोंगाट असल्यामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. चुकून रुग्णाला मृत घोषित केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या प्रकरणामुळे वैद्यकीय निष्काळजीपणावर गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.